राज्यातील शिक्षकांसाठी संमेलनाध्यक्षांची 'संवादयात्रा'

सकाळ विशेष
सकाळ विशेष

लातूर : संमेलनाध्यक्ष झाल्यानंतर हारतुरे स्वीकारण्यात अन्‌ भाषणे करण्यातच वर्ष संपते. त्यामुळे संमेलनाध्यक्षांना ठोस काही करता येत नाही. ही चौकट मोडून संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांनी राज्यातील शिक्षकांबरोबरच विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे. मराठी भाषा हा संवादाचा केंद्रबिंदू असणार आहे. संमेलनाध्यक्षांकडून अशा प्रकारचा उपक्रम प्रथमच होत असून त्याची सुरवात लातूरमधून होणार आहे. 


श्री केशवराज शैक्षणिक संकुलाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्ताने आयोजित सोहळ्यासाठी डॉ. ढेरे उद्या (ता. 28) लातूरमध्ये येत आहेत. यानिमित्ताने 'सकाळ'ने त्यांच्याशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, मराठीतून अध्यापन फार विचारपूर्वक केले जाते, असे नाही. कारण आपण शिक्षण व्यवस्थेची एक चौकट बांधली आहे. त्यापलीकडे जात नाही. शिक्षकांनी तसा प्रयत्न करणे, मुलांना भाषेची गोडी लावणे, त्यांच्यात साहित्याची जाण वाढवणे महत्वाचे आहे. म्हणून आम्ही मराठवाडा, विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र अशा भागांत शिक्षकांच्या कार्यशाळा घेणार आहोत. या उपक्रमाची सुरवात उद्यापासूनच (ता. 28) लातूरात होणार आहे. 


याबरोबरच 'कविता :आकलन आणि रसास्वाद' या विषयावर आठवीपासून पुढील इयत्तांमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधला जाईल. यासंदर्भात दृकश्राव्य माध्यमातील 52 भाग आम्ही तयार केले आहेत. विद्यार्थ्यांना आपली काव्य परंपरा समजावी, महत्वाचे कवी समजावेत, कवितेचे आकलन कसे करावे हेही कळावे, हा यामागील उद्देश आहे. केवळ मुलांनाच नव्हे तर शिक्षक, पालक, वाचकांनाही हा उपक्रम उपयोगी ठरणार आहे. याची सुरवात आम्ही डिसेंबर महिन्यापासून करणार आहोत. यासंदर्भात सरकारच्या राज्य मराठी विकास संस्थेकडे प्रस्ताव पाठवला आहे. तो मान्य झाला तर राज्यभरातील सर्व शाळांमध्ये आमचा हा उपक्रम पोहचेल, असा विश्वासही डॉ. ढेरे यांनी व्यक्त केला. 

... यांचाही संमेलनाध्यक्षपदासाठी विचार व्हावा 
आगामी संमेलनाध्यक्षपदासाठी ना. धों. महानोर, नरेंद्र चपळगावकर, रा. रं. बोराडे, सुधीर रसाळ यांची नावे चर्चेत आहेत. यातील काहींनी या पदासाठी नकारही दर्शवला आहे, याबाबत डॉ. ढेरे म्हणाले, ही सर्वच नावे संमेलनाध्यक्षपदासाठी योग्य आहेत. या नावानंतर किंवा या नावांसोबतच आशा बगे, प्रभा गणोरकर यांच्यासह मधल्या फळीतील सक्षम लेखकांचाही या पदासाठी नक्कीच विचार व्हायला हवा; पण केवळ ज्येष्ठांचीच नावेच पुढे येत राहतात. 

दुष्काळाचे भान ठेऊन संमेलन व्हावे 
आगामी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये होणार आहे; पण उस्मानाबादमध्ये अजूनही भीषण दुष्काळ आहे. वर्षानुवर्षे या भागात अशीच स्थिती आहे. येथील लोक खूप काळापासून दुष्काळ भोगत आहेत. त्यामुळे या भागात सांस्कृतिक-साहित्यिक भूकही मोठ्या प्रमाणात आहे. म्हणून येथे साहित्य संमेलन होणे, हेही तितकेच महत्वाचे आहे; पण दुष्काळी भागात संमेलन होत आहे, याचे भान ठेऊनच अत्यंत साधेपणाने, लेखक-कवींनी कमीत कमी अपेक्षा ठेऊन हे संमेलन साजरे करावे, असे डॉ. ढेरे यांनी सांगितले. 


राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची करण्यासाठी मुख्यमंत्री महिनाभरात वटहुकूम काढणार होते; पण तो अद्याप काढला गेला नाही. मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर याबाबतचा अंतिम निर्णय घ्यावा, यासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवत आहे. 
- डॉ. अरुणा ढेरे, संमेलनाध्यक्ष 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com