Badnapur News : बदनापूर तालुक्यावर पाणीबाणीचे संकट; सिंचन प्रकल्पांतील जलसाठा तळाला

बदनापूर तालुका आणि नैसर्गिक आपत्ती जणू एक समीकरणच झाले आहे. मागच्या तीन वर्षांपासून ओल्या दुष्काळासह अवकाळी पावसाचा मारा सहन करणाऱ्या बदनापूर तालुक्यावर यंदा कोरड्या दुष्काळाने घाला घातला आहे.
बदनापूर तालुक्यावर पाणीबाणीचे संकट
बदनापूर तालुक्यावर पाणीबाणीचे संकटSakal

बदनापूर : बदनापूर तालुका आणि नैसर्गिक आपत्ती जणू एक समीकरणच झाले आहे. मागच्या तीन वर्षांपासून ओल्या दुष्काळासह अवकाळी पावसाचा मारा सहन करणाऱ्या बदनापूर तालुक्यावर यंदा कोरड्या दुष्काळाने घाला घातला आहे.

वर्षभरापूर्वी ओसंडून वाहणारे सिंचन प्रकल्प यंदा जोत्याखाली जाऊन त्यात आता केवळ मृतसाठा शिल्लक राहिला आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींनी देखील तळ गाठल्याने तालुक्यात पाणीबाणीचे संकट उभे राहिले आहे. तालुक्यातील बहुतांशी गावांना टंचाईचा विळखा बसला असून आगामी उन्हाळ्याच्या तीन महिन्यांत हा विळखा आणखी घट्ट होण्याची शक्यता आहे.

बदनापूर तालुक्याच्या भाळी कायम नैसर्गिक आपत्तीचे संकट पाचवीलाच पुजले आहे. २०१९ पूर्वी सातत्याने तालुक्यावर पावसाची खप्पामर्जी राहत होती. त्यामुळे कोरड्या दुष्काळाचे संकट कायम आ वासून उभे राहायचे.

२०१९ पासून निसर्गाने कूस बदलली आणि तालुक्यात अतिवृष्टी झाली. सलग तीन वर्षे हा पाऊस वार्षिक सरासरीपेक्षा दुपटीने झाला. त्यातच अवकाळी पावसाने देखील ठाण मांडल्याने खरीप - रब्बी अशा पिकांचे तीनतेरा वाजले.

त्यात समाधानाची बाब म्हणजे कायम कोरडे राहणाऱ्या सिंचन प्रकल्प आणि विहिरी ओसंडून वाहू लागल्याने पिण्याचा प्रश्न सुटला. मात्र पुन्हा निसर्गाने लहरीपणा दाखवला. मागच्या पावसाळ्यात तालुक्यात वार्षिक सरासरीला निम्म्यापेक्षा कमी पाऊस झाला.

त्यामुळे पुन्हा कोरड्या दुष्काळाच्या खाईत बदनापूर तालुका लोटला गेला. त्यात खरीप पिकांची पावसाअभावी वाढ खुंटल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली. पाण्याअभावी रब्बी पिकांचा पेराही कमालीचा घटला. तर मोसंबी, डाळिंब, द्राक्ष अशा बागाही सुकू लागल्या. त्यातच जमिनीतील पाणीपातळी खालावत चालल्याने तालुक्यातील महत्त्वाकांक्षी सोमठाणा येथील दुधना अपर मध्यम प्रकल्पातील जलसाठा जोत्याखाली गेला. या प्रकल्पात आता मृतसाठाच शिल्लक आहे.

३० गावांना टॅंकरद्वारे पाणी

दुधना अपर मध्यम प्रकल्पात आता मृतसाठाच शिल्लक असल्याने या प्रकल्पावर आधारित बदनापूर शहर, सोमठाणा, दुधनवाडी, बाजार गेवराई, वरुडी, मालेवाडी आदी गावांसह छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील धरणावर आधारित गावांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

तर तालुक्यातील वाल्हा, राजेवाडी सिंचन प्रकल्प, भाकरवाडी आणि आन्वी लघू सिंचन प्रकल्पातील जलसाठा देखील तळाला गेला आहे. त्यामुळे या तलावांवर आधारित गावे देखील टंचाईच्या विळख्यात सापडली आहेत.

अर्थात प्रशासकीय पातळीवर टंचाई दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तालुक्यातील टंचाईग्रस्त ३० गावे, वाड्या, तांड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र टंचाईचा आवाका मोठा असल्याने प्रशासकीय पातळीवर करण्यात येणाऱ्या उपाययोजना तोकड्या ठरत आहेत.

बदनापूर तालुक्यातील सोमठाना येथील दुधना अपर मध्यम प्रकल्प आणि इतर सिंचन प्रकल्प कोरडे पडल्याने भयंकर टंचाई निर्माण झाली आहे. प्रशासनाने यासंदर्भात ठोस उपाययोजना कराव्यात आणि टंचाईग्रस्त नागरिकांना दिलासा द्यावा.

—संजय भुजाळ, नागरिक, बदनापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com