बांबूची शेती ठरेल फायदेशीर, कोण म्हणाले ते वाचा...

bamboo
bamboo

हिंगोली ः राज्यात पडिक क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून, त्यावर बांबूची शेती केल्यास वनक्षेत्र वाढीसाठी फायदेशीर ठरणार असल्याचे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्य कृषिमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी बुधवारी (ता. २४) झालेल्या बैठकीत केले.

येथील भाजप कार्यालयात पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या वेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. या वेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, माजी आमदार गजानन घुगे, रामराव वडकुते, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, शहराध्यक्ष प्रशांत गोल्डी, संतोष टेकाळे आदींची उपस्थिती होती.

झाडांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे 
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व वाढते कार्बनचे प्रमाण कमी करून लोखंड, अल्युमिनियम, प्लॅस्टिक या वस्तूंना पर्यायी म्हणून बांबूची शेती करणे आज काळाची गरज असल्याचे पाशा पटेल यांनी उदारहारणाच्या दाखल्यासह स्पष्ट केले. चिनी किंवा इतर वस्तूंवर भर न देता बांबूपासून तयार केलेला कंगवा, मोबाइल बॉक्स, साबण बॉक्स, पेन आदी वस्तू वापरणे आवश्यक आहे. आता तर चक्क हेलिकॉप्टर व त्यास लागणारे तेलदेखील बांबूपासून तयार केले जात आहे. आजघडीला वृक्षांची कत्तल मोठ्या प्रमाणात केली जात आहे. हे रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी झाडांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

उसापेक्षा बांबूची शेती फायदेशीर
देशात बहुतांश ठिकाणी बांबूची शेती केली जात आहे. यापासून मिळणारे उत्पादनदेखील अधिक असल्याने बांबूपासून लाखो रुपयांचे उत्पन्न होऊन त्यावर अवलंबून असणाऱ्या मजुरांनादेखील कामे मिळण्यास मदत होते. आजघडीला ऊस शेतीपेक्षा बाबूंची शेती परवडणारी असून उसापेक्षा बांबूला चार हजार रुपये टन भाव असल्याचे सांगून शेतकऱ्यांनी आपल्याकडे असलेल्या पडिक जमिनीवर बांबूची लागवड करण्याचे आवाहन केले. औद्योगिक क्षेत्रासाठी बांबूची लागवड केल्यास प्रतिटन २५ हजार भाव मिळून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळणार असून वन क्षेत्र वाढण्यास मोठी मदत होणार असल्याचे श्री. पटेल यांनी सांगितले. कधीही उसापेक्षा बांबूची शेती फायदेशीर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.


बियाणाऐवजी पैसे देण्याची मागणी
सध्या राज्यात तीन पक्षांचे सरकार असून, एकमेकांचे जमत नाही. त्यामुळे नोकरदारांना पैसे देण्यासाठी सरकारकडे पैसेच नसल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांना कुठून देणार, असा टोला लगावला. शेतकऱ्यांना शेती साथ देणारी आहे. मात्र, शेतकऱ्यांनी कंपन्यांकडून बियाणे खरेदी करून पेरल्यानंतर ते उगवलेच नाही हे दुर्दैव असून शासनाने शेतकऱ्यांना होणाऱ्या सोयाबीनचे हेक्टरी मूल्य काढून शेतकऱ्यांना बियाणाऐवजी पैसे देण्याची मागणी केली आहे. पैसे कंपनीकडून घ्या, त्याचे आम्हाला काही सोयरसुतक नाही. परंतु, आता दुबार पेरणी शक्य नसल्याने शासनाने हेक्टरी जे काही उत्पन्न होते त्याची भरपाई करून पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकावेत, अशी मागणी पटेल यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com