या जिल्ह्यात पीककर्जास बॅंकांची नकार घंटाच

PIK KARJ
PIK KARJ

हिंगोली: जिल्ह्यात रब्बी हंगामात पीककर्ज वाटपासाठी बँकांकडून टाळाटाळ केली जात असून आता पेरणीसाठी सावकाराचे उंबरठे झिजविण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे आता प्रशासनाने बँकेवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.


जिल्ह्यात रब्बी हंगामामध्ये २४७ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक, राष्ट्रीयीकृत बँका व महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा यामधे समावेश आहे. याबँकांनी खरीप हंगामात केवळ दहा टक्केच पीककर्ज वाटप केल्यामुळे बँकांकडून रब्बी हंगामात पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण केले जाईल काय? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. खरीप हंगामाच्या वेळी लोकप्रतिनिधी व जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी बैठकांमधून दिलेल्या सूचनांना केराची टोपली दाखवण्यात आली आहे. हीच परिस्थिती आता रब्बी हंगामातही आहे.

तीन टक्केच पीककर्ज वाटप
जिल्ह्यात रब्बी हंगामाचे आतापर्यंत केवळ तीन टक्केच पीककर्ज वाटप झाले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेने ३७ कोटी रुपयांच्या उद्दिष्टापैकी ६९ शेतकऱ्यांना तेरा लाख ८५ हजारांचे कर्ज वाटप केले आहे. राष्ट्रीयीकृत बँकांना १९७ कोटींचे उद्दिष्ट असताना ४२५ शेतकऱ्यांना सहा कोटी ५७ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. तर महाराष्ट्र ग्रामीण बँकेला ४० कोटींचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट असतान या बँकेने केवळ १९६ शेतकऱ्यांना एक कोटी ६२ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे.

शेतकरी आता सावकारांच्या दारात
बँकांकडून कर्ज वाटप होत नसल्याने शेतकरी आता सावकारांच्या दारात चकरा मारत असल्याचे चित्र आहे. सावकारांकडून कर्ज घेऊन शेतकऱ्यांनी पेरणी सुरू केली आहे. काही जणांना मात्र, कर्ज मिळत नसल्याने त्यांच्यावर शेत पडिक ठेवण्याची वेळ आली आहे. या प्रकाराकडे आता जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. दरम्यान, जिल्हाभरात रब्बी हंगामातील पेरणीस सुरवात झाली आहे. मात्र, परतीच्या पावसाने सोयाबीन, ज्वारी, कापूस आदी पिके हातची गेल्याने रब्बी पेरणीसाठी बियाणे, खत कसे खरेदी करावे, याची चिंता लागली आहे. सिंचनासाठी पाणी उपलब्ध असूनही पेरणी करता येत नसल्याचे अनेक शेतकरी सांगत आहेत. 


खरीप हंगामाप्रमाणेच रब्बी हंगामात पीककर्ज देण्यास बँकेकडून टाळाटाळ केली जात आहे. हाती असलेले सर्व पैसे खरीप हंगामात पेरणीसाठी वापरले. आता रब्बी हंगामात कर्ज देण्यास बँकेकडून टाळाटाळ होत असून प्रशासनाने बँकांवर कारवाई करावी.
- गणेश खंडागळे, शेतकरी


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com