अंबाजोगाई - मांजरा धरण बीडसह लातूर व उस्मानाबाद जिल्ह्याची जीवनवाहिनी आहे. या धरणामुळेच शेतीसह नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची तहान भागते. मात्र हे धरण बीड जिल्ह्यात (धनेगाव, ता.केज) असताना, त्याचे नियंत्रण व नियोजन लातूरच्या कार्यालयातून होते. या धरणाच्या पाण्याचा सर्वात जास्त फायदाही लातूरलाच. किमान याचे कार्यालय पूर्वीप्रमाणेच बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईत व्हावे अशी अंबाजोगाईकरांची अपेक्षा आहे.
शेतीचे सिंचन हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून १९७४ मध्ये या धरणाचे काम सुरू झाले. १९८० मध्ये धरणात प्रथम पाणीसाठा झाला. या धरणावर शेतीच्या सिंचनासाठी दोन्ही बाजूंनी डावा व उजवा असे कालवे आहेत. डावा कालवा हा अंबाजोगाई व रेणापूर तालुक्यात तर उजवा कालवा लातूर तालुक्यात आहे. त्यात काही गावे उस्मानाबाद जिल्ह्यातील येतात.
शेतीचे सिंचन हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून १९७४ मध्ये या धरणाचे काम सुरू झाले. १९८० मध्ये धरणात प्रथम पाणीसाठा झाला. या धरणावर शेतीच्या सिंचनासाठी दोन्ही बाजूंनी डावा व उजवा असे कालवे आहेत. डावा कालवा हा अंबाजोगाई व रेणापूर तालुक्यात तर उजवा कालवा लातूर तालुक्यात आहे. त्यात काही गावे उस्मानाबाद जिल्ह्यातील येतात.
या धरणातील पाण्यावर ७३ गावे अवलंबून आहेत. त्यात पिण्याच्या पाण्यासाठी लातूर शहर, लातूर औद्योगिक वसाहत, अंबाजोगाई, कळंब, केज, धारूर व इतर खेड्यांचा समावेश आहे. मांजरा धरण होईपर्यंत आणि त्यानंतरही दहा वर्षे याचे कार्यकारी व उपकार्यकारी पाटबंधारे कार्यालय अंबाजोगाईत होते. १९९० च्या दरम्यान ते लातूरला हलवण्यात आले.
अंबाजोगाईत या कार्यालयाच्या परिसरात अजूनही (कर्मचारी निवास) स्वतंत्र मांजरा वसाहत आहे. अशी सर्व जागा व वसाहत असतानाही हे कार्यालय लातूरला हलवण्याची काय गरज होती? हे मात्र आजवर कोणालाही न उलगडलेले कोडे आहे.
वास्तविक पाहता, धरणाचे नियोजन व नियंत्रणासाठी त्याचे कार्यालय धरणाच्या जवळपास असणे आवश्यक असते. या धनेगाव धरणापासून अंबाजोगाईचे अंतर फक्त ३५ किलोमीटर आहे. तर लातूरचे अंतर ९० किलोमीटर आहे.