बीड : पाच वर्षांत रासायनिक खतांच्या किमती दीड पटीने वाढ

बियाणे, कीटकनाशकेही महागली
Chemical fertilizer
Chemical fertilizersakal

माजलगाव : कृषिप्रधान देशात शेतमालाच्या उत्पादन वाढीसाठी आवश्यक असलेल्या रासायनिक खताच्या किमतीत मागील पाच वर्षांत जवळपास दीड पटीने वाढ झाली आहे. पोटॅशसारख्या खताची किंमत तर तीन पटीने वाढली असून पेरणीसाठी आवश्यक असलेले सर्वच बियाणे, कीटकनाशक औषधाच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीला शेतकऱ्यांकडून भरली जाणारी काळ्याआईची ओटीही महाग झाल्याने शेतमालाच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. दिवसेंदिवस उत्पादन खर्चात होणाऱ्या भरमसाठ वाढीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

शेती हा भारतीय अर्थकारणाचा कणा असून देशाची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात शेतीवर अवलंबून आहे. असे असताना उत्पादनखर्च कमी करून शेतमालाच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी शासन कोणतेही प्रयत्न करताना दिसत नाही. देशातील बहुतांशी शेती कोरडवाहू असल्याने शेतकऱ्यांना पावसावर अवलंबून राहावे लागते. एकीकडे निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतमालाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले असताना दुसरीकडे मात्र, शेतीसाठी आवश्यक असलेले खते, बियाणांच्या किमतीत मात्र भरमसाठ वाढ झाली आहे.

यामुळे शेतकऱ्यांचे बिघडलेले आर्थिक गणित हे वाढत्या शेतकरी आत्महत्येच्या घटनेस कारणीभूत ठरत असल्याचे निष्पन्न होत आहे. उत्पादन वाढीसाठी मोठ्या प्रमाणात वापरण्यात येणाऱ्या रासायनिक खतांच्या किमतीत मागील पाच वर्षांत जवळपास दीड पटीने वाढ झाली आहे.

केंद्र शासनाच्या रासायनिक खताच्या अनुदानात कपातीच्या धोरणामुळे दरवर्षी खताच्या किमती पाच ते सहा टक्क्यांनी वाढत असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्च वाढला आहे. पाच वर्षांपूर्वी सरकारकडून रासायनिक खत कंपन्यांना देण्यात येणारी सबसिडी हळूहळू कमी केली जात असल्याने वाढत्या किमतीचा भुर्दंड शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.

रासायनिक खताच्या काही नामांकित कंपन्यांनी व्यापाऱ्यांना पुरवठा करताना लिंकिंगचा फंडा सुरु केला आहे. खताच्या १० टनामागे ५० हजार रुपयाची लिंकिंग केली जात असल्याने व्यापाऱ्यांना नाईलाजाने चढ्या भावाने किंवा लिंकिंगने खतविक्री करावी लागत आहे. यात झुआरी, जयकिसान, पी.पी.एल., चंबळ (उत्तम) या कंपन्या वरीलप्रमाणे लिंकिंग करीत आहेत.

-नारायण उगले, खत व्यापारी

पूर्वी खताचे भाव कमी असल्याने शेतकरी उत्पादन वाढीसाठी खताचा वापर करीत होता. आता बियाणासह खताच्याही किमती भरमसाठ वाढल्याने खत टाकणे परवडत नाही. परिणामी उत्पादन कमी होत आहे.

-नवनाथ शिंदे, शेतकरी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com