

Beed News
esakal
बीड: ज्या रस्त्यावरून रोज हजारो नागरिक आणि निरागस शाळकरी मुले ये-जा करतात, त्याच रस्त्यांच्या मधोमध आज मृत्यूचे जिवंत सापळे उभे आहेत. दीड महिन्यापूर्वी २५ फेब्रुवारी रोजी गोरे वस्तीत एका १५ वर्षांच्या कोवळ्या मुलाचा विद्युत धक्क्याने बळी गेला आणि संपूर्ण बीड हळहळले. वाटले होते, की आता तरी महावितरण प्रशासनाला जाग येईल, अधिकारी काहीतरी करतील. मात्र, दुर्दैवाने बीडमधील महावितरण आणि नगरपालिका प्रशासनाचे कातडे इतके जाड झाले आहे, की दीड महिना उलटूनही परिस्थिती जैसे थे आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर उघड्यावर पडलेले ३० रोहित्र (डीपी) आणि रस्त्याच्या मधोमध असलेले तब्बल ९०० पोल आजही मृत्यूला उघड आमंत्रण देत आहेत. आता बीडची जनता संतप्त होऊन सवाल विचारतेय, की पुन्हा एखादा बळी गेला, तर त्याचे पाप कोणाच्या माथ्यावर असेल?