माजलगाव : खरीप हंगामाचे दोन महिने संपत आले तरी तालुका परिसरात मोठा पाऊस झालेला नाही. तर धरण कार्यक्षेत्रात देखील हीच परिस्थिती असून दोन महिन्यांत पडलेल्या पावसावर धरणाचा पाणीसाठा चाळीस टक्क्यांवर गेला असून धरण कार्यक्षेत्रात मोठ्या पावसाची प्रतीक्षाच आहे.
खरीप हंगामाच्या सुरुवातीला जून महिन्यात अत्यल्प पाऊस झाला तर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून चांगला पाऊस बरसला. आता दुसरा महिला संपत आला तरी देखील पाहिजे तसा मोठा पाऊस झालेला नाही. असे असले तरी मागील तीन वर्षांपासून सतत धरण भरत असल्याने भूगर्भातील पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे तालुक्यातील सिंचन क्षेत्रात देखील वाढ झाल्याने शेतकऱ्यांनी उसासह फळबागांची लागवड केली आहे.
मागील वर्षी आणि यावर्षी देखील या धरणाच्या पाण्यावर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड झाली आहे. दरम्यान पावसाळ्याचे दोन महिने संपत आले असून मागील वर्षात या महिन्याची आकडेवारी पाहिली तर जुलै २०२१ मध्ये धरण ५१ टक्यांवर होते. तर यावर्षी ४० टक्यांवर आहे. त्यामुळे धरण भरण्यासाठी धरण कार्यक्षेत्रात मोठ्या पावसाची आवश्यकता आहे. दरम्यान या धरणातील पाण्याचा लाभ बीड, परभणी, नांदेड या तीन जिल्ह्यांना सिंचनासाठी होतो. त्याचबरोबर बीड, माजलगाव शहर व पुनर्वसित अकरा खेड्यांना धरणातून पिण्यासाठी पाणीपुरवठा देखील केला जातो.
माजलगाव धरण सद्यःस्थिती
टक्केवारी : ४०.३८ टक्के.
पाणी पातळी : ४२९ मीटर.
उपयुक्त पाणीसाठा : १२६ दलघमी.
एकूण पाणीसाठा : २६८ दलघमी.
धरणाच्या पाणीपातळीत जसजशी वाढ होईल तसे धरण पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते. ती गर्दी टाळण्यासाठी दोन पोलिस कर्मचारी धरणावर तैनात आहेत धरणावरील सीसीटीव्ही यंत्रणा, पथदिवे कार्यान्वित आहेत. धरणाचा पाणीसाठा चाळीस टक्यांवर गेला आहे.
- बी.आर. शेख, धरण अभियंता, माजलगाव.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.