बीड - स्वच्छ बीड आणि सुंदर बीड अशा गर्जना ऐकून आणि पोस्टर वाचून बीडकरांना संताप होत आहे. अस्वच्छ, दुर्गंधी असलेले आणि बकाल बीड अशी अवस्था नगर परिषद प्रशासनाच्या कारभारामुळे झाली आहे. ‘अंधेर नगरी आणि पोरगळ कारभार’ यामुळे बीडकरांना वेळेवर पाणी नाही,
नाल्यांची सफाई नाही, कचराकुंड्या फुल्ल असल्याने दुर्गंधी आणि अनेक रस्ते चिखलमय तसेच बहुतांशी पथदिवे बंद असताना प्रशासन कागदी घोडे नाचविण्यात आणि पुढारी श्रेय घेण्यात गुंग आहेत.
मोकाट जनावरांच्या त्रासाने मेटाकुटीला आलेल्या बीडकरांना आता मोकाट कुत्र्यांचा त्रास आणि चावा सहन करावा लागत आहे. जर, प्रशासन नीट जनावरे आणि कुत्रे सांभाळत (आवर घालू शकत) नसेल तर बीडकरांना भौतिक सुविधा कशा देणार, असा प्रश्न आहे. विशेष म्हणजे बीडकरांच्या या प्रश्नावर सर्वच पक्षांचे नेते गप्प आहेत.
जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या बीड शहराचा दिवसेंदिवस विस्तार वाढत आहे. विस्तारित भागाला पाणी, वीज, रस्ते या सुविधा तर दूरच, पण मुळ बीडकरांची भर पावसाळ्यात पाण्यासाठी भटकंती सुरु आहे. पालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करुन अमृत अटल योजना आणली असली तरी योजनेचा प्रशासनाने पुरता खेळखंडोबा केला आहे.
पुढारी आणि पालिका प्रशासन महाराष्ट्र राज्य जीवन प्राधिकरण व ठेकेदारांकडे बोट दाखवीत असले तरी प्रशासन व पुढाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे बीडकरांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
कोट्यवधी रुपये खर्चाची भुयारी गटार योजनेचे देखील तीन तेरा वाजले आहेत. केवळ कोट्यवधींच्या विकास योजनांच्या वल्गना केल्या जात असल्या तरी त्याचा बीडकरांना फायदा किती हा संशोधनाचा विषय आहे.
विशिष्ट ठेकेदारांसाठी शहरात काही वर्षांपूर्वी असेच कोटींवर रुपये मोजून पथदिवे बसविले खरे. पण, निम्म्याहून अधिक पथदिवे बंद असताना दहा वर्षांची देखभाल दुरुस्तीची जिम्मेदारी असलेल्या ठेकेदारांपुढे सगळेच गप्प आहेत. नाल्यांची स्वच्छता तर अलीकडे केवळ ऐकण्यापुरता शब्द राहिला आहे. तर, लोकांनी स्वत:हून आणून टाकलेला कचरा कुंड्यांची शोभा झाला आहे. यामुळे शहरात दुर्गंधी आणि रोगराईचे साम्राज्य आहे.