Video: जिल्हाधिकारी कार्यालयात कापूस फेकून भाजपचे आंदोलन

file photo
file photo

परभणी : शेतकऱ्यांच्या कापूस पिकासह इतर अनेक मागण्यांसाठी गुरुवारी (ता.चार) भाजपच्या जिंतूर येथील आमदार मेघना बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दरवाज्यासमोरच ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य गेट जवळच कापूस फेकून प्रचंड घोषणाबाजी केली.

> शेतकऱ्यांचा संपूर्ण कापूस खरेदी करून त्यांना पेरणीसाठी तत्काळ पैसे द्यावेत व कापसाच्या दर्जावरून शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबवावी, शेतकऱ्यांना तातडीने कर्ज वाटप करण्यात यावे. पोखरा योजनेत नोंदणी केलेल्या व काम केलेल्या सर्वांच्या अडचणी दूर कराव्यात, जिल्ह्यातील सर्व कोरोना योद्ध्यांना भत्ता द्यावा, जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्ण व विलगीकरण कक्षातील नागरिकांची होणाऱ्या गैरसोयीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे व सुविधा पुरविण्याची व्यवस्था करण्याचे आदेश द्यावेत, सर्व आशासेविकांना टाळेबंदीच्या काळात काम केल्याबद्दल प्रतिमहिना पाच हजार रुपये भत्ता द्यावा, व्यापारी, लघुउद्योजक, वाहनधारक, छोटमोठे कर्जदार ज्यांचा कर्ज परतफेडीचे हप्ते सहा महिन्यानंतर सुरु करावे, बारा बलुतेदारांना प्रतिकुटुंब दहा हजार अनुदान द्यावे, शेतकऱ्यांचे ओला, कोरडा दुष्काळ या बाबतचे अनुदान व इतर सरकारकडून येणे असलेले अनुदान तत्काळ देण्यात यावे, दुकाने उघडण्याचा कालावधी सकाळी ९ ते सायंकाळी ५ असा करण्यात यावा, या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. 

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतले गाऱ्हाणे ऐकून 
या आंदोलनात जिंतूरच्या भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार रामराव वडकुते, जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, महानगराध्यक्ष आनंद भरोसे, विठ्ठलराव रबदडे, बालाप्रसाद मुंदडे, सुरेश भुमरे, बाळासाहेब जाधव आदी सहभागी झाले होते. सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य दरवाज्यासमोर ठिय्या आंदोलनास सुरवात झाली. यावेळी आंदोलकांनी सोबत आणलेले कापसाचे पोते या ठिकाणी फोडून कार्यालयाच्या समोरच कापूस फेकून दिला. आंदोलकांना जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चेसाठी आमंत्रित करून त्यांचे गाऱ्हाणे ऐकून घेतले. त्यांच्या मागण्या शासनापर्यंत पाठवू, असे आश्वासन देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले.

हेही वाचा : ‘कोरोनातून मी असा झालो बरा!’ -

पीककर्ज तत्काळ द्यावे
जिल्ह्यातील ५० हजार शेतकऱ्यांच्या घरात कापूस शिल्लक आहे. हा कापूस संपूर्णपणे खरेदी झाला पाहिजे. यामुळे जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. असे असतांनाही सरकार जागे होत नाही. त्यामुळे कापूस खरेदी करावा, पीककर्ज तत्काळ द्यावे आणि अनुदान तातडीने वाटप व्हावे, यासाठी आम्ही हे आंदोलन करत आहोत.
- मेघना साकोरे - बोर्डीकर, आमदार, भाजप
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com