
लातूर ः आम्ही जिल्ह्याच्या सीमा कडेकोट बंद केल्याचे पोलिसांच्या वतीने सांगण्यात येत आहे. तरी देखील पुणे, मुंबई व हैदराबादहून लातूरमध्ये वीस ते पंचवीस लोक आलेच कसे, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. या सर्वांची येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत तपासणी करण्यात आली आहे. यातूनच लातूरच्या सीमा अद्यापही कोरोनाच्या बाबतीत असुरक्षितच असल्याचे समोर येत आहे.
जिल्ह्यात परराज्यातून आलेल्या बारांपैकी आठ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या होत्या; पण १४ दिवसांनंतर त्या सर्व व्यक्तींच्या स्वॅबच्या नमुन्याचे अहवाल निगेटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्याला थोडासा दिलासा मिळाला आहे. जिल्हा कोरोनाच्या बाबतीत शून्यावरच आहे. जिल्ह्यात अद्याप एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला नाही. ही समाधानाची बाब आहे; पण अद्याप धोका टळलेला नाही. एखादा रुग्ण आढळून आला तर जिल्हा कोरोनाच्या यादीत येणार आहे. हे लक्षात घेऊन पालकमंत्री अमित देशमुख हे गेली काही दिवस दररोज बैठका घेऊन लातूर जिल्ह्याच्या सीमा कडेकोट बंद करा, ये-जा करणाऱ्यांची तपासणी करा, शहरात ठिकठिकाणी नाकेबंदी करून इतर जिल्हा किंवा परराज्यातून कोणी येणार नाही याची दक्षता घ्या असे सांगत आहेत.
जिल्ह्याच्या सीमेवर कडेकोट बंदोबस्त आहे, असेही पोलिसांच्या वतीने सांगण्यात येत आहे. असे असले तरी सोमवारी (ता.२०) येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयात अचानक २० ते २५ लोक तपासणीसाठी दाखल झाले. हे लोक पुणे, हैदराबाद व मुंबईहून आलेले असल्याची माहिती पुढे आली आहे. जिल्ह्याच्या सीमा कडेकोट बंद असताना हे लोक आलेच कसे, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे. असेच लोक येत राहिले तर कदाचित लातूर जिल्हा धोकादायक क्षेत्रात जायला वेळ लागणार नाही. याकडे आता वरिष्ठांनीच लक्ष देण्याची गरज आहे.
हेही वाचा ः व्हॉट्सॲपवर अर्ज करा अन् व्यवसायाची परवानगी घ्या, लातूर जिल्हा प्रशासनाची सुविधा
पालकमंत्र्यांची नाराजी
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयात अचानक २० ते २५ लोक तपासणीसाठी दाखल झाले. ते पुणे, मुंबई व हैदराबाद येथून आल्याची माहिती मिळाली. जिल्ह्याच्या सीमा कडेकोट बंद असतानाही असे लोक जिल्ह्यात आलेच कसे, याबाबत पालकमंत्री अमित देशमुख यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत नाराजी व्यक्त केली. तसेच अधिकाऱ्यांना ताकीदही दिली आहे. यासंदर्भात पोलिस प्रशासनाने अधिक सजग राहावे. अशा लोकांना तपासणी नाक्यावर तपासणी करून संस्थात्मक विलगीकरण कक्षात १४ दिवस ठेवल्यानंतरच घरी पाठवावे, अशी सूचनाही श्री. देशमुख यांनी केली आहे.
----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.