Corona Virus : ‘करोना’मुळे व्यापार, लघुउद्योग संकटात

File photo
File photo

नांदेड :  ‘करोना’ व्हायरसने चीनमध्ये थैमान घातले आहे. त्याचा फटका भारतीयांना बसण्याची शक्‍यता आहे. चीनमध्ये करोना व्हायरसमुळे आणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील औद्योगिक उत्पादनावर प्रचंड परिणाम झाला आहे. नजीकच्या काळात चीनमधून भारतात येणाऱ्या मोबाईल आणि कॉम्प्युटरच्या आयातीत मोठी घसरण होण्याची शक्‍यता आहे. 

भारतातील स्मार्टफोनची बाजारपेठ मोठी आहे. यात ‘मेड इन चायना’ फोनचा बोलबाला होता. मात्र, मागील महिनाभरापासून चीनने करोना व्हायरसच्या भीतीने इतर देशांशी असलेला व्यापार थांबविला आहे. करोना व्हायरस पसरू नये म्हणून निर्यातीवर अंशत: निर्बंध घालण्यात आले आहेत. याशिवाय चीनमधून खेळणी, फर्निचर, बिल्डर हार्डवेअर, फुटवेअर, कपडे, फर्निशिंग फॅब्रिक, एफएमजीसी उत्पादने, भेटवस्तूंचे साहित्य, घड्याळी, इलेक्‍ट्रॉनिक साहित्य, विजेची उपकरणे, स्वयंपाकाचे साहित्य, ऑटो स्पेअर पार्टस, मशीनरी साहित्य, कागद, स्टेशनरी साहित्य, फर्टिलायझर्स, सर्जिकल साहित्य, लोखंडाची मोठी उत्पादने, कमी किमतीचे एअर कंडिशनर, इंजिनिअरिंग साहित्य, रसायन, बांधकाम साहित्याला लागणारे साहित्य, प्लॅस्टिक आणि प्लॅस्टिकचे साहित्य, कॉम्प्युटर व कॉम्प्युटर साहित्य, अगरबत्ती तयार करणारे बांबू आदी वस्तू येतात.

व्यापाऱ्यांसह लघुउद्योजक संकटात
भारातील असंख्य लघुउद्योजक चीनमधून विविध माल आयात करत होते. कोरोना व्हायरसमुळे यावर निर्बंध आल्याने हे लघुउद्योजक संकटात सापडले आहेत. विशेष, या उद्योगात काम करणाऱ्यांवरही उपासमारीची वेळ येवून ठेपली आहे. चिनमधुन येणाऱ्या मालावर निर्बंध आल्याने व्यापारीही चिंतेत सापडले असून, आहे तो मालही कोणी घ्यायला तयार नसल्याचे चित्र बघायला मिळत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांसह लघुउद्योजकही संकटात सापडले असून, यावर केंद्र व राज्य शासनाने पावले उचलून भारतातीय लहान व मध्यम उद्योगांकडून उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी होतांना दिसत आहे.

चीनमधील शेकडो कारखाने बंद 
बीजिंग, शांघाय, शेंझेन, ग्वान्गझू शहरांमधील उद्योगांना ‘करोना’ची झळ बसली आहे. "करोना'चे सर्वाधिक बळी गेलेल्या हुबेई प्रांतातील झेझिंग आणि जिंन्नसगू भागातील शेकडो कारखाने अनेक दिवसांपासून बंद आहेत. यामुळे स्मार्टफोन कंपन्यांना फटका बसण्याची शक्‍यता आहे. अनेक कंपन्यांनी भारतात इलेक्‍ट्रॉनिक्‍स साहित्याची निर्मिती सुरू केली असली तरी या कंपन्या चीनमधील आयातीवर अवलंबून आहेत. मोबाईल आणि कॉम्प्युटरचे सुटे भाग आजही चीनमधून मोठ्या प्रमाणात आयात केले जातात. त्यामुळे भारतातील स्मार्टफोन उत्पादनावर परिणाम होणार आहे. 

हे तुम्ही वाचाच - ‘कोरोना’च्या धास्‍तीने नागनाथ मंदिरात शुकशुकाट
 
देशांतर्गत उत्पादनक्षमता वाढावी 
सरकारने चीनमधून येत असलेले साहित्य आणि इतर देशांतून आलेल्या वस्तूंमुळे भारतीय नागरिकांच्या आरोग्याला काही धोका आहे का, हे तपासले पाहिजे. तसे असल्यास त्यावर उपचारात्मक पाऊल उचलणे गरजेचे आहे. ई-कॉमर्ससह इतरही देशांतील भारतात येणाऱ्या वस्तूंची तपासणी करावी. त्यानंतरच त्या वस्तू देशात येऊ देण्यास परवानगी द्यावी. तसेच भारतीय लहान व मध्यम उद्योगांनी आपली उत्पादन क्षमता वाढविण्याची गरज असल्याचे मत नांदेडमधील व्यापाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com