
लातूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी - मार्चमध्ये घेण्यात आलेल्या दहावी व बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीत मोठी गडबड झाली आहे. उत्तरपत्रिका तपासताना शिक्षक व पर्यवेक्षकांनी चुका केल्याने अनेक विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसला. उत्तरपत्रिकांची झेरॉक्स प्रत काढण्याचा आर्थिक भुर्दंड सोसून कसरत करत गुणवाढीसाठी धावपळ करावी लागली. यात गुणवाढ होईपर्यंत प्रवेशाची मुदत संपल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. यातूनच एक हजार 240 विद्यार्थ्यांच्या गुणांत तर 126 विद्यार्थ्यांच्या निकालात बदल झाल्याचे पुढे आले आहे.
मंडळाकडून निकाल जाहीर झाल्यानंतर विविध विषयांत कमी पडलेल्या गुणांबद्दल शंका असलेल्या विद्यार्थ्यांना गुणपडताळणी तसेच पुन्हा तपासणी (फेरमूल्यांकन) करण्याची संधी देण्यात येते. यासाठी विद्यार्थ्यांना कमी गुण पडलेल्या विषयाची प्रत्येकी चारशे रुपये रोख भरणा करून उत्तरपत्रिकेची झेरॉक्स प्रत काढावी लागते. त्यानंतर ही उत्तरपत्रिका विद्यालयातील संबंधित विषय शिक्षकांकडून तपासून घेऊन गुणपडताळणी व फेरमूल्यांकनासाठी मंडळात द्यावी लागते. मंडळाकडून विषय तज्ज्ञांचे पॅनेल नियुक्त करून फेरमूल्यांकन करण्यात येते.
त्यानंतर गुण व निकालात बदलाचा निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना नवीन गुणपत्रिका देण्यात येते. यासाठी पंधरा ते वीस दिवस विद्यार्थी व त्यांच्या पालकांची धावपळ होते. काहींना अकरावी व अन्य अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया संपल्यानंतर नवीन गुणपत्रिका मिळत असल्याने त्यांचे नुकसान होते. यंदा मात्र, उत्तरपत्रिका तपासणीत मोठी गडबड झाल्याचे दिसून आले. यामुळेच मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकांची झेरॉक्स काढून गुणपडताळणी व फेरमूल्यांकनासाठी अर्ज केले.
गुणांची बेरीज चुकली
उत्तरपत्रिकांची तपासणी करताना शिक्षकांनी अनेक चुका केल्या असून, एका प्रकरणात संस्कृत विषयाच्या उत्तरपत्रिकेची पुन्हा पडताळणी करणाऱ्या मॉडरेटरकडून बेरीज चुकल्याचे पुढे आले. यामुळे विद्यार्थ्यांचे 87 वरून 99 झाले. पाचपेक्षा अधिक गुणांची वाढ झालेल्या प्रकरणात संबंधित सर्व शिक्षकांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात येणार असल्याचे मंडळाचे प्रभारी अध्यक्ष संजय यादगिरे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.