नागरिक, बॅंकेच्या पैशांवर सायबर दरोडा 

नागरिक, बॅंकेच्या पैशांवर सायबर दरोडा 

औरंगाबाद - नोटाबंदीनंतर कॅशलेस व्यवहाराला चालना दिली जात असतानाच "यूपीआय ऍप'द्वारे फसवणुकीची शक्‍यता निर्माण झाली आहे. मेट्रो शहरातील बॅंक, नागरिकांच्या पैशांचे परस्पर ट्रान्झॅक्‍शन करून कोट्यवधींचा गंडा घालण्याचे सत्र सुरूच असून, आता औरंगाबादेतही सुमारे पासष्ट जणांना असा फटका बसला. अशा प्रकारच्या ऍपचा वापर करून शहरात एकूण नऊ कोटी 43 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती पोलिस आयुक्तांनी दिली. 

नोटाबंदीनंतर ऑनलाईन व्यवहाराला चालना देण्यासाठी एकीकडे पाऊले उचलली जात असतानाच त्याचे दुष्परिणाम आता समोर येत आहेत. रिझर्व्ह बॅंकेने यूपीआय गेटवे सादर केले. या इंटरफेसला 21 राष्ट्रीयीकृत बॅंका ऍपद्वारे जोडण्यात आल्या. ही बाब ओळखून सायबर अटॅकर वित्तीय संस्था, बॅंकांसमोर उभे राहून नागरिकांना बॅंकेची व्यक्ती असल्याचे सांगत ऍप डाऊनलोड करण्यास भाग पाडीत आहेत. त्यानंतर त्यांचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक मिळवून सीम, डेटाद्वारे परस्पर ट्रान्झॅक्‍शन करीत असल्याचे समोर आले आहे. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी माहिती दिली, की औरंगाबादेत सायबर सेलकडे पासष्ट तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यूपीआय ऍपद्वारे नागरिकांच्या बॅंक खात्यातून नऊ कोटी 53 लाखांच्या रकमेचे आतापर्यंत परस्पर ट्रान्झॅक्‍शन झाले. शहरात विविध ठिकाणी असे प्रकार घडले. या प्रकरणात रीतसर तक्रारी दाखल करून घेण्यात येणार आहेत. तूर्तास ही प्रकरणे आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग झाली आहेत. 

अशी झाली फसगत 
अटॅकर तुमच्या बॅंक खात्यासाठी दिलेला रजिस्टर्ड मोबाईल क्रमांक दहा मिनिटांसाठी वापरण्यासाठी घेतात. पाच ते दहा मिनिटांसाठी दोन ते दहा हजार रुपये आमिष दाखवून ते तुम्हाला पैसेही देतात. यानंतर तुमच्याच अथवा स्वत:च्या मोबाईलमध्ये सीम टाकून यूपीआय ऍप डाऊनलोड करतात. ऍप डाऊनलोडनंतर "रिक्वेस्ट मनी' असा प्रोग्राम दिसतो. याद्वारे तुमच्या खात्यातील सर्व रकमेचे ट्रान्झॅक्‍शन होते. हाच कमकुवत धागा वापरून अटॅकर एका वेळी जास्तीत जास्त एक लाख रुपये स्वत:च्या किंवा अन्य खात्यांवर वळवत आहेत. 

खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्याला फटका 
शहरातील एका खासगी कंपनीत रुजू असलेले दिनेश उत्तम हरणे यांच्या खात्यातून एक लाखाचा व्यवहार झाला. वास्तविक त्यांच्या खात्यात केवळ नऊ हजार रुपये होते. मात्र, यूपीआयचा वापर करून रिक्‍वेस्ट मनीच्या पर्यायामुळे हरणे यांच्या खात्यातून एक लाखाची रक्कम परस्पर हडपण्यात आली. अशाच प्रकारे त्यांच्या सहकाऱ्यांची फसगत झाल्याची माहिती हरणे यांनी "सकाळ'ला दिली. 

अशाप्रकारे नागरिक व बॅंकेचे औरंगाबादेत फसवणुकीचे प्रकार समोर आलेत. या घटनेनंतर महाराष्ट्र बॅंकेसोबत बैठक घेतली. यात डेटाबेस तयार करून बॅंक रीतसर तक्रार देणार आहे. तसेच या सर्व प्रकरणात आम्ही तपास करीत असून, यंत्रणा कामाला लावली आहे. 
- अमितेशकुमार, पोलिस आयुक्त, औरंगाबाद.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com