सरकारच्या घोळात अडकली भरपाई

File photo
File photo

नांदेड : परतीच्या पावसाने जिल्ह्यातील साडेसहा लाख शेतकऱ्यांचे हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. या बाबत जिल्हा प्रशासनाने नुकसानग्रस्तांच्या भरपाईसाठी ५०७ कोटींची मागणी केली. यानुसार शासनाकडून मिळालेल्या १२३ कोटींच्या पहिल्या हप्त्याचे वाटपही झाले. यानंतर मात्र, नवनियुक्त महाविकास आघाडी सरकार जोरबैठकांत व्यस्त असल्याने शेतकऱ्यांच्या दुसऱ्या टप्प्यातील भरपाईला विलंब होत आहे. रब्बीच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांचे सरकारच्या वाढीव मदतीकडे लक्ष लागले आहे.

जिल्ह्यात ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे खरिपातील कोरडवाहू, बागायती व बहुवार्षिक अशा एकूण सहा लाख ४८ हजार ३१६ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले. यात सात लाख १८ हजार ४३६ शेतकऱ्यांना फटका बसल्यामुळे त्यांना ‘एनडीआरएफ’च्या प्रचलित निकषानुसार हेक्टरी सहा हजार आठशेप्रमाणे दोन हेक्टरपर्यंत भरपाईसाठी शासनाकडे ४३० कोटी ९९ लाख रुपयांची मागणी प्रशासनाने केली होती. परंतु, दरम्यानच्या काळात राज्यपाल महोदयांनी हेक्टरी मदतीत एक हजार दोनशे रुपयांची वाढ करून कोरडवाहू व बागायतीसाठी पिकांसाठी आठ हजार रुपये, तर बहुवार्षिक फळपिकांसाठी १८ हजार प्रतिहेक्टर देण्याची घोषणा केली होती. 

शेतकरी खोळंबलेत
यामुळे जिल्हा प्रशासनाला शेतकऱ्यांना भरपाइ देण्यासाठी ४३१ कोटींच्या निधीत ७६ कोटींची वाढ करून नव्या दरानुसार ५०६ कोटी ९५ लाख २२ हजार रुपयांची मागणी केली होती. नुसार जिल्ह्याला पहिल्या टप्यात १२३ कोटी १४ लाख २३ हजार रुपये मिळाले. त्याचे वितरण जिल्हास्तरावरुन लगेच ता. २० नोव्हेंबर रोजी करण्यात आले. हा निधीही शेतकऱ्यांना वाटप झाल्याची माहिती प्रशासनाने ता. २८ नोव्हेंबर रोजी विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून शासनाला कळविली. परंतु, शासनाकडून वाढीव मदतीबाबत अद्याप निर्णय झाला नसल्यामुळे दुसरा हप्ता रखडला आहे. परिणामी रब्बी पेरणीच्या तयारीत असलेले शेतकरी खोळंबले आहेत.

वाढीव भरपाईची प्रतीक्षा
अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झेलावे लागेलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी हेक्टरी पंचवीस हजार रुपये देण्याची मागणी लावून धरली होती. यानंतर ते राज्याचे मुख्यमंत्री झाल्यामुळे शेतकऱ्यांना वाढीव भरपाईची प्रतीक्षा लागली आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारानंतर होणाऱ्या शासन निर्णयाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com