‘कोरोना’च्या खाईतून आलास लेका....गरम पाण्यान आंघूळ धुई...!

download.jpg
download.jpg


भोकर, (जि. नांदेड) ः कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने जगाला सळो की पळो करून सोडले आहे... गंभीर आजारावर सध्या तरी उपचार नसल्याने देश-विदेशात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. सर्वत्र एकच हाहाकार उडाला असून जीव वाचविण्यासाठी धडपड सुरू आहे. ग्रामीण भागातील बहुतांशी मुलं -मुली शिक्षण-रोजदांरी, नौकरी, व्यवसायासाठी मुबंई-पुण्यात आणि परदेशात वास्तव्याला आहेत. तीथे मोठ्या प्रमाणात लागण झाल्याने गावाकडे पालक चिंतेत आहेत. पाल्य वापसी घरी आल्यावर ‘कोरोनाच्या खाईतून आलास लेका... गरम- गरम पाण्यानं आघुंळ धुई’ म्हणजी जंतू नाहीसा होईल...असे चित्र पाहावयास मिळते आहे.


महाभयंकर आजाराची लागण 
मागील सत्तर-अंशी वर्षांपूर्वी उंदराच्या पिसांपासून पटकी (प्लेग) या महाभयंकर आजाराची लागण झाली होती. त्या वेळी अशा गंभीर आजारावर कुठलीच उपचार पद्धत अवगत नव्हती. जुने जाणते माहितगार वैद्य झाडपाला देऊन बहुतांशी आजारावर उपचार करीत होते. मात्र, पटकी आजारावर कसलीच उपचार पद्धती सापडली नाही. परिणामी गावच्या गाव मरणाच्या खाईत सापडली होती. एक-दोन शव पुरून आली की घरी आल्यावर दुसरे दोन-चार जण मरण पावत असत. दिवसभर गावातील लोकांना हेच एकमेव काम सुरू असायच अशा महाभयंकर आजारांनी जनता मेटाकुटीला आली होती. गावागावांत स्मशान शांतता पसरली होती. यातून बचाव करण्यासाठी देवाकडे प्रार्थना केल्या खेरीज त्यांच्याकडं दुसरा कोणताही पर्याय नव्हता. हळूहळू ते विषाणू कमी झाले आणि पुन्हा गावातील परिस्थिती पूर्वपदावर आली. मागील ते भंयकर घातक दिवस आठवले की अंगावर काटा उभा राहतो व मन आजही सुन्न होते. दुश्मनालाही अशी वेळ येऊ नये, अशी माहिती किनी (ता. भोकर) येथील वयोवृद्ध व्यक्ती नामदेव कांबळे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली आहे.

सध्या जगात वेगवेगळे वैज्ञानिक प्रयोग विकसित झाले असून संगणकामुळे जग मुठीत आलं आहे. अशक्य बाब आता शक्य झाली आहे. अनेक राष्ट्र प्रगत देश म्हणून ओळखले जातात. दरम्यान, अनेक विषाणूजन्य संसर्ग आजारांनी आपले पाय पसरले होते. त्यावर वेळीच उपाययोजना करण्यात आल्याने प्रतिबंध करण्यात यश मिळाले आहे. मागील तीन महिन्यांपूर्वी चीनमध्ये ‘कोरोना’ विषाणूंचा संसर्ग झाला आहे. तेच विषाणू आता सबंध जगात फैलावत असल्याने जनता मेटाकुटीला आली आहे. अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यावर मात्र, कायमस्वरूपी उपचार पद्धती सापडली नाही. त्यामुळे संपूर्ण जग हैराण झाले आहे. महाराष्ट्रातही कोरोनाची लागण झाली आहे.


वेड्या मायची वेडी माया 
राज्यातील अनेक मुलं - मुली, नौकरदार, व्यापारी कामानिमित्त बाहेरगावी प्रदेशात वास्तव्याला आहेत. सध्या भंयकर घातक विषाणूमुळे जनतेच्या मनात धडकी भरली आहे. बाहेर असलेल्या आपल्या मुला-मुलींची काळजी आई-वडिलांला सतावते आहे. कामधंदे सोडून घराकडे निघून या, अशी विनवणी केली जात आहे. त्यामुळे पाल्य गावाकडे येताना दिसत आहेत. घरी आल्यावर गरम उकळत्या पाण्यात अंगावरील कपडे. बॅग‌सह अन्य साहित्य स्वच्छ पाण्याने धुऊन मुलाला साबणाने आंघोळ घातली जात आहे.


प्रशासनाची करडी नजर 
नांदेड जिल्ह्यातील प्रशासनाने कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून वेळीच योग्य ती उपाययोजना करण्यासाठी पावले उचलली आहेत. जनतेने आपले सर्व व्यवहार बंद ठेवून ‘गो करोना’ अशी भूमिका घेतली आहे. जनता संचारबंदी यशस्वी झाली आहे. या दरम्यान ज्या विभागाने डोळ्यात तेल घालून चोख कामगिरी बजावली आहे. त्यांना थाळीनाद, टाळ्या वाजवून मनापासून धन्यवाद दिले आहेत. पुढील आठवडाभर प्रशासन यावर करडी नजर ठेवून आहे. जनतेने अफवांवर विश्र्वास न ठेवता सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com