जिंतूरमध्ये वर्षभरात पावणेदोन हजार नागरिकांना कोरोनाची लागण; चाळीस नागरिकांना प्राणास मुकावे लागले

file photo
file photo

जिंतूर  ( जिल्हा परभणी ) : शहरासह तालुक्यात मार्च २०२० ते एक एप्रिल २०२१ या वर्षभराच्या कालावधीत आरोग्य विभागाने आरटीपीसीआर आणि रॅपिड अँटीजेन किटद्वारे तब्बल १८ हजार ४४६ नागरिकांच्या तपासण्या केल्या. त्यामधून एक हजार ७३ नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून या वर्षभरात शहरासह ग्रामीण भागातील ४० नागरिकांना प्राणास मुकावे लागले असल्याची  धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

मागील वर्षभरापासून कोरोना विषाणूच्या महामारीने जगभरात थैमान घातले आहे. त्यामुळे आरोग्यासह सामाजिक, आर्थिक, धार्मिक जीवनावर विपरीत परिणाम होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा  प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच असल्याने असंख्य नागरिक कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. त्यातच मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रात कहर केला असल्याने बाधित रुग्णांच्या संख्येचा आलेख दिवसागणिक वरच चढत आहे. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे जिंतूर शहरात मार्च २०२० ते एप्रिल २१ या वर्षभरात आरोग्य विभागाच्यावतीने आरटीपीसीआरद्वारे चार हजार ५६६ व रॅपिड अँटीजेन किटद्वारे तीन हजार ३२ आणि ग्रामीण भागात आरटीपीसीआरद्वारे आठ हजार ३०५ तर रॅपीड अँटीजेन किटद्वारे दोन हजार ५४३ असे एकूण अठरा हजार ४४६ चाचण्या घेण्यात आल्या.

यापैकी शहरात ५२१ तर ग्रामीण भागात ५५२ याप्रमाणे एक हजार ७३ नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. यामधून शहरात १९ आणि ग्रामीण भागात २१ नागरिकांना आपले जीव गमवावे लागले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश बोराळकर आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. रविकिरण चांडगे यांनी दिली आहे. 

या कोरोनासुराने वर्षभरापासून समाजाच्या प्रत्येक क्षेत्राला चांगलाच हादरा दिला असल्याने सर्वच क्षेत्र प्रभावित झाले आहे.विशेषकरुन कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आणि सततच्या लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेले मजूर, कामगार आणि किरकोळ व्यावसायिक चांगलेच ग्रासले गेले. अनेकांचे आर्थिक नियोजन पुर्णतः कोलमडले आहे. त्यामुळे अनेकांना प्राथमिक गरजा पूर्ण करणेही कमालीचे कठीण होऊन बसले आहे. अशीच परिस्थिती आणखी कांही दिवस राहिल्यास असंख्य नागरिकांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तेंव्हा कोरोना या महाभयंकर आजाराला हद्दपार करण्यासाठी नागरिकांनी एकजुटीने शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे तंतोतंत पालन करणे अत्यंत गरजेचे आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com