२८ हजारावर शेतकऱ्यांचा कापूस शिल्लक

file photo
file photo

परभणी : पावसाळा सुरू असून खरिपाच्या पेरण्यांनी आता वेग घेतला आहे. दुसरा कापूस येण्याची वेळ झाली असताना अजूनही गत हंगामातील कापसाची विक्री झाली नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. अद्याप २८ हजार ५३९ शेतकऱ्यांचा कापूस घरात आहे. पावसातही कापूस खरेदी सुरू राहण्यासाठी खरेदी केंद्रावर ताप्तुरते शेड उभारले जाणार असून कापसाच्या साठवुणकीसाठी खासगी गोदामे भाडेतत्वावर घेतले जाणार आहेत.


गत हंगामात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. खासगी बाजारात योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी शासकीय खरेदी केंद्रावर कापूस विक्रीला पसंती दिली. परभणी पणन महासंघ, भारतीय कपास निगगम (सीसीआय) यांच्यामार्फत कापूस खरेदी केली जात आहे. फेब्रुवारी महिन्यात खरेदी सुरू झाली होती. परंतु, मार्च महिन्यात लॉकडाउनमुळे खरेदी बंद झाली. त्यानंतर एप्रिलअखेरीस खरेदी सुरू झाली. त्यासाठी शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी करण्यात आली. त्यामध्ये ४१ हजार २२१ शेतकऱ्यांनी नोंदणी केली.


२८ हजार ५३९ शेतकऱ्यांचा कापूस शिल्लक

कापूस खरेदीसाठी पणन महासंघाचे चार आणि सीसीआयचे सहा, असे एकूण दहा केंद्र आहेत. लॉकडाउनपूर्वी एक लाख आठ हजार ९४३ शेतकऱ्यांचा २६ लाख दहा हजार ८८९.२१ क्विंटल कापूस खरेदी झाला आहे. तर लॉकडाउननंतर ३६ हजार ८२२ शेतकऱ्यांचा सात लाख एक हजार ६५६.४० क्विंटल कापूस खरेदी झाला आहे. एकूण एक लाख ४५ हजार ७६५ शेतकऱ्यांचा ३३ लाख १२ हजार ५४५ क्विंटल कापूस खरेदी झाला आहे. अजूनही २८ हजार ५३९ शेतकऱ्यांचा कापूस शिल्लक राहिला आहे. 
आता पावसाळा सुरू झाला आहे.


विक्री होईपर्यंत साठवणूक करावी

शेतकरी पेरण्यांच्या कामात गुंतले आहेत. अशा परिस्थितीमध्ये घरात असलेला कापूस विक्री करायाचा अन् दुसऱ्या बाजूने पेरणी करायची, अशा दुहेरी तणावात शेतकरी सापडले आहेत. पावसातदेखील कापूस खरेदी सुरू ठेवण्याचे आदेश पणण मंत्र्याने दिले असल्याने कापूस खरेदी सुरू आहे. परंतु, परभणी जिल्ह्यात दररोज पडणाऱ्या पावसामुळे खरेदीमध्ये व्यत्यय येत आहे. खरेदी केंद्रावर शेडची सोय नसल्याने कापूस आणता येत नाही. तसेच कापूस ठेवण्यास गोदामे उपलब्ध नसल्याने कापूस खरेदी करायची कशी, असादेखील प्रश्न असल्याने जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर व जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी यावर मार्ग काढत खरेदी केंद्रावर ताप्तुरते शेड उभारण्याचे आदेश संबंधित बाजार समित्यांना दिले आहेत. बाजार समित्यांच्या सेस फंडातून यावर खर्च करून तत्काळ मान्सून शेड उभारा, अशा सूचना बाजार समित्यांचे सभापती व सचिव यांना केल्या आहेत. तसेच कापूस गाठी साठवणुकीसाठी बुलडाणा अर्बन बॅंकेचे गोदाम करार पद्धतीने ताब्यात घेत त्यामध्ये विक्री होईपर्यंत साठवणूक करावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

हेही वाचा : हजाराची लाच घेताना बिट जमादार अटकेत

 नुकसानीचे पंचनामे होणार
जिल्ह्यात कापूस खरेदी दरम्यान, ता. ३१ मे, एक ते दहा जून दरम्यान, झालेल्या पावसामुळे शासकीय खरेदी केंद्रावरील कापूस, सरकी व गाठी यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी तालुकास्तरीय समिती स्थापन केली जाणार आहे. त्यामध्ये तहसीलदार, सहायक निबंधक, बाजार समिती सचिव, जिनिंग प्रतिनिधी, व्यापारी प्रतिनिधी, केंद्रप्रमुख ग्रेडर यांची समिती गठित स्थापन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com