मान्सून दारात, कापूस घरात; कापूस कोंडी सुटणार कधी?

file photo
file photo
Updated on

परभणी : मान्सूनपूर्व पाऊस दररोज पडत आहे. तर स्वत: मान्सून वेशीवर आला आहे. कधीही त्याचे धोधो आगमन होऊ शकते. त्यामुळे एकीकडे पेरणीची लगबग सुरू झाली आहे. अंतिम मशागत, खत, बियाणांची खरेदी सुरू झाली आहे. सगळीकडे खरिपाची तयारी सुरू झाली आहे. परंतु, अजूनही जिल्ह्यातील ३० हजारांवर शेतकऱ्यांच्या घरात लक्ष्मीरूपी कापूस अडकलेला आहे. खरेदी प्रक्रियेला म्हणावा तसा वेग नाही. त्यामुळे येत्या १५ दिवसांत कापूस खरेदी होणे गरजेचे आहे.
जिल्ह्यात गत हंगामात दोन लाख ६९ हजार ६५ हेक्टरवर कपाशीची लागवड झाली होती. त्यामुळे यंदा मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन झाले आहे. साधारण जानेवारी महिन्यात खरेदी हंगाम सुरू झाला होता. कापूस महामंडळ (फेडरेशन), भारतीय कापूस निगम (सीसीआय) यांच्याकडून किमान आधारभूत किमतीने खरेदी सुरू झाली होती. परंतु, कापसाची अवक पाहता खरेदी केंद्र अपुरे पडू लागल्याने सर्वच केंद्रांवर कापूस कोंडी झाली होती. भल्या मोठ्या दोन ते तीन किलोमीटर अंतरापर्यंत कापूस वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. खरेदी सुरू असताना मध्येच ढगाळ वातावरणामुळे खरेदी बंद करावी लागली. पुढे मार्च महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे खरेदी बंद झाली होती. परंतु, शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून शासनाने ता. २० एप्रिलपासून खरेदी सुरू केली. परंतु, खरेदीला कोणत्याही प्रकारे वेग दिला नसल्याने अजूनही खरेदीची प्रक्रिया संथ गतीने सुरू आहे. त्याचा परिणाम म्हणून जून उजाडला तरी ३०  हजारांवर शेतकऱ्यांचा कापूस घरातच आहे. खरेदी केंद्रांची संख्या कमी असल्याने खरेदीचा वेग मंदावला आहे.

आठ दिवसांवर आली खरिपाची पेरणी 
परभणीत कापूस विक्रीसाठी ४६ हजार ७७६ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली. तर चार हजार ९० शेतकऱ्यांनी ऑफलाइन पद्धतीने बाजार समित्यांकडे नोंदणी केली. नोंदणीकृत शेतकऱ्यांपैकी काही शेतकऱ्यांनी एकापेक्षा अधिक वेळा नोंदणी केली. त्यामुळे अधिक वेळा नोंदणी केलेली नावे वगळली असता एकूण संख्या ४१ हजार २२१ एवढी झाली आहे. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या कापसाची जिल्ह्यातील कापूस पणन महासंघाच्या चार, सीसीआयच्या सहा, अशा दहा केंद्रांवर खरेदी सुरू झाली आहे. लॉकाडाउनमध्ये ता. ३० मेअखेरपर्यंत दहा केंद्रांवर दहा हजार २१३ शेतकऱ्यांचा तीन लाख दहा हजार ७०.६८ क्विंटल कापूस खरेदी केला आहे. खासगी व्यापारी, अनुज्ञप्तीधारक व्यापाऱ्यांनी २१ हजार ५९१ शेतकऱ्यांचा दोन लाख ९३ हजार ४०५.४० क्विंटल कापूस खरेदी केला आहे. नोंदणी केल्यापैकी ता. ३० मेअखेरपर्यंत ३१ हजार आठ शेतकऱ्यांचा कापूस शिल्लक राहिला आहे. आता खरिपाची पेरणी अगदी सात ते आठ दिवसांवर आली आहे. 


फौजदारी कारवाई
लवकर खरेदी व्हावी यासाठी खरेदी केंद्र संख्या वाढविले आहेत. दहा शासकीय खरेदी केंद्र, १५ ग्रेडर आणि २८ जिनिंगवर खरेदी सुरू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या नावावर कापूस विक्री करताना अढळून आल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल.
- मंगेश सुरवसे, जिल्हा उपनिबंधक

 

शेतकरी हतबल
जिल्ह्यात कापूस कोंडी ही बाजार समित्यांच्या अनागोंदी कारभारामुळे झाली आहे. ऑफलाइन नोंदीच्या नावाखाली व्यापाऱ्यांचा कापूस शेतकऱ्यांच्या नावावर घातला जात आहे. काही बाजार समित्यांमध्ये सात ते दहा किलो कट्टी सुरू केल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.
- किशोर ढगे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Medical Negligence Alleged: Woman Dies After Hernia Surgery in Umarga
Massive Anti-Encroachment Drive: 400+ Structures Demolished in Garib Nagar
Prestigious State-Level Award for Principal Dr. Chandrasen Kothawale
NEET Paper Leak Probe: CBI Conducts Secret Investigation in Ambajogai
Marathi News Esakal
www.esakal.com