कापूस खरेदीत कोटींची उलाढाल !

file photo
file photo

मानवत (जि.परभणी) : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती यार्डात या हंगामात तब्बल तीन लाख ३६ हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. सरासरी त्याची उलाढाल दीडशे कोटींवर होते. कापसाचे भाव स्थिर असल्याने दर वाढण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे. या वर्षी उत्पादन खर्चात मोठी वाढ झालेली असताना कापसाला अपेक्षित दर मिळत नसल्याने अर्थकारण बिघडले आहे.

मानवत (जि.परभणी) येथील कृषी उत्त्पन्न बाजार समिती यार्डात २१ नोव्हेंबरपासून कापूस खरेदी सुरू करण्यात आली आहे. चांगला दर व रोख रक्कम अदा केली जात असल्याने दरवर्षी जिल्हातील सर्वाधिक कापूस खरेदी मानवत येथे होत असते. गतवर्षी बाजार समिती यार्डात पावणेपाच लाख क्विंटल कापूस खरेदी करण्यात आली होती. गुरुवार (ता. ३०) पर्यंत येथील बाजार समिती यार्डात तीन लाख ३६ हजार २२ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला होता. यापैकी एक लाख दहा हजार ८७५ क्विंटल कापूस ‘सीसीआय’मार्फत खरेदी करण्यात आला आहे, तर, तब्बल दोन लाख २५ हजार १४७ क्विंटल कापूस खासगी व्यापाऱ्यांमार्फत खरेदी करण्यात आला आहे. शासनाने कापसास पाच हजार ५५० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. तर, खासगी व्यापारी सरासरी चार हजार ८०० ते पाच हजार १०० रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी करीत आहेत. सरासरी उलाढाल दीडशे कोटींवर होते.

पाचशे वाहनांची आवक 
येथील बाजार समिती यार्डात दररोज चारशे ते पाचशे वाहनांची आवक सुरू आहे. या वर्षी कपाशीचे उत्पादन चांगले झाले असले तरी, खर्चात मोठी वाढ झाली आहे. सततच्या पावसामुळे वारंवार फवारणी करून किडींचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणावा लागला होता. शिवाय वेचणीसाठी प्रतिक्विंटल तब्बल सातशे ते आठशे रुपये मोजावे लागले होते. त्या तुलनेत कपाशीला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी अडचणी सापडला आहे.

दर वाढण्याची प्रतीक्षा
गतवर्षी हंगामाच्या शेवटी दरात सुधारणा झाली होती. यामुळे या वर्षीदेखील बहुतांश शेतकऱ्यांनी कापूस विक्री न करता दर वाढण्याची प्रतीक्षा करीत आहेत. परंतु, मागील दोन महिन्यांत दर स्थिर असल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे. फेब्रुवारी महिन्यात तापमानात वाढ होऊन आगीच्या घटनेत वाढ होत असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात माल विक्रीसाठी आणतात. त्यामुळे येत्या महिनाभरात मोठ्या प्रमाणात आवक वाढणार आहे.

हेही वाचा -  परभणीत जोरदार पावसाची हजेरी


कमी खर्चाच्या पिकाला चांगला दर
या वर्षी कापसाचे दर स्थिर आहेत. मागील दोन महिन्यांत दरात कोणत्याही प्रकारची वाढ झालेली नाही. चांगल्या दर्जाच्या मालास हमीभाव मिळत असला तरी, बहुतांश माल खासगी व्यापाऱ्यांना विक्री करावा लागत आहेत. दुसऱ्या बाजूला खर्चात मोठी वाढ झालेली असताना अपेक्षित दर मिळत नसल्याने कापसाचे आर्थिक ताळमेळ बिघडला आहे. तुलनेत सोयाबीनसारख्या कमी खर्चाच्या पिकाला चांगला दर मिळत आहे.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com