
औरंगाबादहुन जालन्याकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीवरील दाम्पत्य ठार झाले आहे. हा भीषण अपघात मंगळवारी (ता.आठ) दुपारी एक वाजता पाथ्रीकर कॅम्पस समोर घडला.
बदनापूर (जि.जालना) : औरंगाबादहुन जालन्याकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीवरील दाम्पत्य ठार झाले आहे. हा भीषण अपघात मंगळवारी (ता.आठ) दुपारी एक वाजता पाथ्रीकर कॅम्पस समोर घडला. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गारखेडा तांडा (ता. सिंदखेडराजा, जि.बुलडाणा) येथील रामेश्वर बाबुराव चव्हाण (वय ४५) व त्यांच्या पत्नी इंदूबाई (वय ४०) असे दोघे औरंगाबाद येथे एका लग्न सोहळ्यासाठी मंगळवारी आले होते.
लग्न सोहळा पार पडल्यानंतर दोघे दाम्पत्य आपल्या दुचाकीने (एमएच २८ एए ४०९५) गावाकडे परतत असताना भरधाव वेगाने जालन्याकडे जाणाऱ्या कारने (एमएच ०१ बीएफ ९३९१) त्यांच्या दुचाकीस पाठीमागून धडक दिली. या अपघातात रामेश्वर व इंदूबाई चव्हाण दाम्पत्य गंभीर जखमी झाले. यात त्यांचा मृत्यू झाला. अपघातात कारच्या दर्शनी भागाचे तर दुचाकीच्या पाठीमागील भागाचे मोठे नुकसान झाले.
अपघातानंतर कार चालक घटनास्थळी न थांबता पळून जात असताना स्थानिक नागरिकांनी पाठलाग करून कार नागेवाडी टोलनाक्यावर अडवून कार चालकास पकडले. त्यानंतर त्यास पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. दरम्यान, माहिती मिळताच बदनापूर ठाण्याचे निरीक्षक मारुती खेडकर, सहायक फौजदार श्री. खंडागळे, इब्राहिम शेख आदींनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. चव्हाण दांपत्याचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बदनापूर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले होते. दरम्यान, या प्रकरणी मृत रामेश्वर चव्हाण यांचे काका शेषराव रायसिंग चव्हाण यांच्या तक्रारीवरून बदनापूर पोलिस ठाण्यात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास श्री. खंडागळे करीत आहेत.
Edited - Ganesh Pitekar