परभणी शहरात पुढील दोन दिवस संचारबंदी- पोलिसांचा शहरातून रुट मार्च

file photo
file photo

परभणी : कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी परभणी शहरासह सर्व तालुक्याच्या ठिकाणी शुक्रवार, ता. ३१ जूलै पासून ते ता. दोन ऑगस्टच्या मध्यरात्री पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दोन दिवसाच्या संचारबंदीदरम्यान लोकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन पोलिसांनी केले. शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता शहरातील महत्वाच्या रस्त्यावर पोलिसांच्यावतीने रुट मार्च ही काढण्यात आला.

परभणी येथे कोरोना विषाणु संसर्गाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. आज घडीला कोरोना विषाणु संसर्गावर उपचार घेणाऱ्यांचा आकडा अडीचेशेच्या जवळ पोहचला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन या बाबतीत कडक धोरण अवलंबित आहे. गेल्या महिण्याभरापासून जिल्ह्यात दर शनिवार, रविवार संचारबंदी लागू करण्यात येत आहे. गेल्या आठवड्यापासून सुरळीत बाजारपेठ सुरु झालेली आहे. परंतू शनिवार आणि रविवार या दोन दिवसात कडक संचार बंदी लागू करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी शुक्रवारी (ता.३१) सायंकाळी संचारबंदीचे आदेश काढले आहेत. यात शुक्रवारी (ता.३१) सायंकाळी पाच वाजल्यापासून ते ता. दोन ऑगस्ट च्या रात्री बारा वाजेपर्यंत परभणी शहर व त्या लगतचा पाच किलोमिटरचा परिसर तसेच प्रत्येक नगरपालिकाची ठिकाणे या संचारबंदीच्या आदेशा खाली आलेली आहेत.

पोलिसांचा शुक्रवारी सायंकाळी रुटमार्च
शुक्रवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून संचारबंदी लागू झाली असून या संचारबंदीची कडक अमलबजावणी करण्यासाठी पोलिस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय व सहायक पोलिस अधिक्षक नितीन बगाटे यांनी शहरातील सर्व पोलिस ठाण्यांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. शुक्रवारी सायंकाळी सहायक पोलिस अधिक्षक नितीन बगाटे यांनी शहरातील तीनही पोलिस ठाण्याच्या हद्दीत रुट मार्च काढला. या मार्च दरम्यान पोलिसांकडून नागरीकांना संचारबंदी दरम्यान कुणीही घराच्या बाहेर पडू नये असे आवाहन केले जात होते.

१५ ऑगस्टपर्यत इ परवाने स्थगित
कोरोना विषाणुचा फैलाव जोरात होत असून त्यावर रोख मिळवण्यासाठी जिल्हा प्रशासन योग्य त्या उपाययोजना आखत आहे. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी शुक्रवारी सायंकाळी परभणी जिल्ह्यात येणाऱ्या व्यक्ती व वाहनांना देण्यात येणाऱ्या ई पास स्थगित ठेवण्याचे आदेश दिले आहेत. परभणी जिल्ह्यात येण्यासाठी दैनदिन किंवा इतर स्वरुपातील प्रवासाचे कोणतेही ई परवाने, इतर परवानग्या ता. १५ ऑगस्ट पर्यंत देण्यात येऊ नयेत असे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले आहेत.

वैद्यकीय कारणास सुट
केवळ वैद्यकीय तातडीच्या कारणाची खात्री झाल्यास व सदर व्यक्ती आपल्या क्षेत्रातील रहिवाशी असल्याचे पुरावे सादर केल्यानंतरच परवानगी देण्यात येईल. त्याच प्रमाणे यातून मालवाहतुक व अत्यावश्यक सेवा व वैद्यकीय तातडीची सुट असलेल्या व्यक्तींना व वाहनांना सुट असणार आहे.
- दीपक मुगळीकर, जिल्हाधिकारी, परभणी

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com