सध्या मानवी मूल्यांच्या चिंध्या

गणेश विसपुतेंचा घणाघात : विद्रोही साहित्य संमेलनाचे उद्‍घाटन
Vidrohi Sahitya Sammelan udagir
Vidrohi Sahitya Sammelan udagirsakal

उदगीर : भारतीय इतिहासात आजच्या काळाइतका क्रौर्य, दमनाचा काळ कधीच नव्हता. आज मानवी मूल्ये, लोकशाहीची पायाभूत तत्त्वे आणि कल्याणकारी राज्याची कल्पना यांनी निगुतीने विणलेल्या वस्त्राची वीण केवळ उसवलेलीच नाही तर त्याच्या चिंध्या-धांदोट्या होताना आपण पाहत आहोत, अशी घणाघाती टीका विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष गणेश विसपुते यांनी सत्ताधाऱ्यांवर केली.

सुफी संत परंपरेचे अभ्यासक सय्यद सरवर चिश्ती यांच्या हस्ते सोळाव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे शनिवारी येथे उद्‍घाटन झाले. त्यावेळी विसपुते बोलत होते. स्वागताध्यक्ष डॉ. अंजुम कादरी, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. आनंद पाटील, कोकणी कवी शैलेंद्र मेहता, गोवा येथील मराठी साहित्यिक प्रभाकर ढगे, प्रतिभा अहिरे, नाटककार प्रकाश त्रिभुवन, कार्याध्यक्ष अरविंद एकंबेकर आदी उपस्थित होते.

विसपुते म्हणाले, ‘येथील वैविध्याने शेकडो वर्षे आपल्याला संपन्न, समृद्ध केले आहे. आपल्याला एकरंगी होऊन गरीब होणे चालणार नाही. त्यासाठी बोलणे, विचार करणे या मूलभूत मानवी लक्षणांचा विसर पडता कामा नये. भारतीय लोकशाहीच्या इतिहासात आजच्या काळाइतका हिंसा, द्वेष, क्रौर्य, दहशत, पुस्तकाचा शत्रू आणि दमनाचा दुसरा काळ नाही. आजची सत्ता वंचिताच्या विरोधात आहे. पण, हे चित्र बदलेल, याबाबत आशावादी आहे.

‘‘संमेलन होत असलेल्या भूमीशी माझी जन्माने नाळ बांधलेली आहे. ज्या बहुरंगी संस्कृतीतले इथले वैविध्य पाहत आम्ही वाढत होतो त्यात मराठी गद्याला नवा चेहरा देणारे चक्रधरांसारखे महानुभाव होते, हिंदू-तुर्क संवाद लिहिणारे कनाथ होते, ज्ञानेश्वर, जनाबाई, बहिणाबाई, नामदेव असे वारकरी परंपरेतील संत होते,’’ अशा शब्दांत विसपुते यांनी मराठवाड्याबद्दल गौरवोद्गार काढले. प्रा. समाधान इंगळे यांनी सूत्रसंचालन केले.

जातीची उतरंड फोडून उद्‌घाटन

व्यासपीठावर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि स्त्री अशी मडक्यांची उतरंड केली होती. ती काठीने फोडून सय्यद सरवर चिश्ती यांच्यासह मान्यवरांनी संमेलनाचे उद्‍घाटन केले. संमेलनाध्यक्ष विसपुते यांनी विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे बोधचिन्ह रेखाटून ‘विषमतेला नकार अन् समतेला होकार’चा नारा दिला.

घटना बदलली तर बहुजनांचेच नुकसान

‘‘मोदी-शहांनी मुस्लिमांना एक केले. बहुजनांचा वापर केला जात आहे. धर्माच्या नावावर ते मत देत आहेत. जर घटना बदलली तर त्यात मुस्लिमांचे काही नुकसान होणार नाही तर बहुजनांचेच होणार आहे. कारण मुस्लिमांमध्ये जातीची उतरंड नाही. सध्या अल्पसंख्याकांना घाबरवण्यासाठीच हिजाबसारखे सांस्कृतिक राजकारण केले जात आहे,’’ असा आरोप उद्‌घाटक चिश्ती यांनी केला.

‘विद्रोही’संमेलनात

- मराठीच्या इतिहासात पहिल्यांदाच डॉ. अंजुम कादरी यांच्या रूपात एका महिलेला संमेलनाच्या स्वागताध्यक्षाचा मान देण्यात आला, असा आयोजकांचा दावाय

- अध्यक्ष विसपुते यांनी अत्यंत संयमाने विचार मांडले तर आयोजन समितीमधील प्रा. प्रतिमा परदेशी या जहालपणे व्यक्त झाल्या. त्यामुळे आयोजक जहाल तर अध्यक्ष मवाळ असे चित्र पाहायला मिळाले.

फेरीला उत्सफूर्त प्रतिसाद

विद्रोही साहित्य मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात शनिवारी सकाळी नऊला शहरातून विचारफेरी काढून झाली. ‘कितीही येवोत द्रोणाचार्य, दान अंगठ्याचे देणार नाही’ अशा घोषणा देत साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे चौकातून अण्णा भाऊंच्या पुतळ्याला अभिवादन करून फेरीला सुरुवात झाली. फेरीतून जातीअंत, समानतेचा संदेश देण्यात आला. संमेलनाचे अध्यक्ष गणेश विसपुते, स्वागताध्यक्ष डॉ. अंजुम कादरी, मुख्य संयोजक निवृत्ती सांगवे आदींसह सर्व जाती-धर्माचे विद्यार्थी, नागरिकांनी फेरीत सहभाग घेतला.छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी लक्ष वेधून घेतले. मुस्लिम विद्यार्थ्यांची संख्याही लक्षणीयही होती. आदिवासी नृत्य, वारकऱ्यांची पावली, लेझीम आकर्षण ठरले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com