

Beed News
esakal
किल्ले धारूर: अंधार पडलेला असताना घाटातून एखादे अवजड वाहन संथ गतीने खाली उतरत असते. अचानक हवेचा दाब कमी होतो, ब्रेक फेल होतात आणि पुढच्याच क्षणी एका भीषण आवाजाने धारूरचा घाट हादरून जातो. आरडाओरडा, काचांचा खच आणि रक्ताने माखलेला रस्ता... हे चित्र धारूर घाटासाठी आता नित्याचेच झाले आहे. पुन्हा एक घर उघड्यावर पडलं, अशी हतबल भावना स्थानिक नागरिक व्यक्त करतात. गेल्या आठ वर्षांत या तीन किलोमीटरच्या अरुंद पट्ट्याने शेकडो संसार उद्ध्वस्त केले आहेत. या घाटातून प्रवास करताना वाहनचालकांच्या काळजाचा ठोका चुकतो आणि प्रवाशांच्या चेहऱ्यावर भीतीचे थर स्पष्ट जाणवतात. हा घाट नसून मृत्यूचा सापळा बनला आहे, अशी भीषण वास्तवता आज समोर आली आहे.