‘या’ आजारामुळे संत्र्याला मागणी वाढली अन् भावही वधारले

santra
santra

सेनगाव ः परतीच्या झालेल्या अतिवृष्टीमुळे रब्बी हंगामातील पिकांचे उत्पादन समाधानकारक राहिले असून संत्र्याचे उत्पन्न यावर्षी भरपूर झाले मात्र त्याचे दर कोसळले होते. या आठवड्यात कोरोना विषाणू जन्य आजाराच्या वाढत्या प्रभावामुळे संत्र्याच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. यापूर्वी १५ हजार रूपये टन विक्री होणाऱ्या संत्र्याला आता ३५ हजार रुपये टन भाव मिळत आहे.

तालुक्यातील शेतकऱ्यांचा प्रमुख हंगाम खरीप असतो. पाण्याची उपलब्धी असणाऱ्या शेतकऱ्यांकडून रब्बी हंगामात विविध भाजीपाला, फळबाग, फूले, गहू, हरभरा याचे उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला जातो. यावर्षी खरीप हंगामातील पीक काढणी दरम्यान अतिवृष्टीच्या झालेल्या पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. मात्र झालेल्या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांच्या उत्पादनाच्या अपेक्षा वाढल्या होत्या. विशेषतः फळबाग करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये संत्र्याचे उत्पादन अधिक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल तालुक्यात आहे.

उत्पादन वाढल्याने भाव कोसळले
चांगल्या झालेल्या पावसाचा फायदा संत्रा उत्पादनाला झाला. त्यामुळे भरपूर उत्पादन झाले मात्र व्यापाऱ्यांकडून अपेक्षित खरेदीसाठी प्रतिसाद मिळाला नाही. गतवर्षी संत्रा ५०० रूपये कॅरेट या दराने भाव मिळाला, २५ हजार रूपये टनाचा दर होता. परंतू, यावर्षी १८० रूपये कॅरेट या दराने व्यापारी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांकडून खरेदी होऊ लागला. साधारणतः १५ हजार रूपये टन आणि हे फळ विक्री होत असल्याने संत्रा उत्पादक शेतकरी चांगलेच अडचणीत आले आहेत. मोठ्या प्रमाणात उत्पादन झाल्याने भाव कोसळण्याचा प्रकार घडला. विशेषतः संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांच्या मागे लागून माल विक्री करावा लागला.

ताजा भाजीपाला, फळांचा वापर आहारात करा
या आठवड्यात देशासह इतर देशात कोरोना विषाणुजन्य आजाराचा प्रादुर्भाव वाढल्याने रूग्णांत वाढ झाली. परिणामी, विदेशातून भारतातील संत्र्याच्या मागणीत वाढ झाली. वैद्यकीय तज्ज्ञांकडून ताजा भाजीपाला, फळे याचा आहारात जास्त वापर करण्याचे आवाहन केले जात आहे. प्रमुख्याने सत्र्यांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारे ‘क’ जीवनसत्व जास्त प्रमाणात असते. पाण्याचे प्रमाण ८७ टक्के असते. उन्हाळ्यात शरिरातील पाण्याची भर काढून टाकण्याची रसाचे फळ आरोग्यदायी संत्रा फळ आहे. यासह विविध जीवनसत्व असल्यामुळे याचा वापर जास्त करावा, यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाते.

विदेशातून प्रचंड मागणी वाढली
या आठवड्यात २० हजार रूपये दराने विक्री होणाऱ्या संत्र्याच्या किमतीत अचानक मोठी वाढ झाली असून ३५ हजार रूपये टनाने व्यापाऱ्यांकडून खरेदी केली जाऊ लागली आहे. विषाणुजन्य आजाराचा वाढत्या प्रादुर्भावामुळे विदेशातून प्रचंड मागणी वाढल्याने संत्र्यांच्या दरात दुपटीने वाढ झाली आहे.

दर कोसळल्यामुळे व्यापारी खरेदीसाठी आलाच नाही
बहुतांश शेतकऱ्यांकडून व्यापारी संत्र्याचा मळा फुलला की ठराविक दराने सौदे करून इसार देतात. त्यामुळे आधी कमी दराने सौदा झालेल्या शेतकऱ्यांना मात्र किमती वाढूनही त्याचा फायदा होत नाही. तालुक्यातील शिवनी येथे एका शेतकऱ्याचा व्यापाऱ्यांनी संत्र्याचा मळा ठराविक किमतीने खरेदीसाठी दोन लाख रुपये इसार दिला मात्र दर कोसळल्यामुळे तो व्यापारी माल खरेदीसाठी आलाच नाही.

दोन एकर क्षेत्रफळात संत्र्याची फळबाग
आमच्याकडे एकूण जमिनीपैकी दोन एकर क्षेत्रफळात संत्र्याची फळबाग आहे. गतवर्षी पाचशे रूपये कॅरेटने विक्री झालेले संत्रे यावर्षी चक्क १८० रूपये दराने व्यापाऱ्यांना दिली. या आठवड्यात कोरोना संसर्गजन्य आजाराच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विदेशातून मोठी मागणी वाढल्याने ७०० रूपये कॅरेट दराने व्यापाऱ्यांकडून संत्रे खरेदी होऊ लागली आहे. - गजानन अवतार, शेतकरी.

सत्र्यांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारे जीवनसत्व
उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची कमतरता विविध रसांच्या फळाच्या सेवनाने पूर्ण केली जाते. ताजा भाजीपाला व फळांचा वापर आहारात आरोग्यासाठी चांगला असतो. सत्र्यांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारे ‘क’ जीवनसत्व जास्त असते. त्यासोबतच विविध महत्त्वपूर्ण जीवनसत्वही राहतात, त्यामुळे संत्रा हे फळ आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक आहे. - डॉ. सतीश रुणवाल, तालुका आरोग्य अधिकारी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com