कुत्र्यांच्या संसर्गाचा धोका बळावतोय : कसा ते वाचलेच पाहिजे

File photo
File photo

नांदेड : सध्या वातावरणातील बदलामुळे लहान मुलांसह मोठ्या व्यक्तिंनाही अनेक साथीच्या आजाराला सामोरे जावे लागत आहे. वातावरणात होत असलेल्या या बदलामुळे आता गावातील पाळीव तसेच मोकाट कुत्र्यांवर सुद्धा याचा परिणाम होताना दिसून येत आहे.

शहरातील कुठल्याही परिसरात जा, कुत्र्यांचे घोळकेच्या घोळके दृष्टीस पडतात. या कुत्र्यांची दहशत पसरली असल्याने महिला व शाळकरी मुलांमध्ये धास्ती बसली आहे. मुकाट कुत्र्यांमध्ये बहुतांश कुत्र्यांना खरूज होणे, अंगावरील पुर्ण केस गळणे, अंग लाल पडणे अशा अनेक आजारांनी ग्रासलेले आहे. याकडे महापालिकेसह पशविभागाने लक्ष देवून विविध आजारांनी ग्रासलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आता नागरिकांमधून होत आहे.  

मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा
काही दिवसांपूर्वी शिवनगर भागात कुत्र्यांना अशाच प्रकारच्या संसर्गामुळे मारून फेकून देण्यात आले होते. त्यावेळी सुद्धा त्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. त्यानंतर प्राणी मित्रांनी त्यावर आक्षेप घेत आरोग्य विभागाला जाब विचारला होता. त्यानंतर त्याचे काय झाले? हे अजूनही गुलदस्त्यातच आहे. त्यामुळे आता या हजारो संसर्ग झालेल्या कुत्र्यांचे काय होणार? असा प्रश्न प्राणी मित्रांनी उपस्थित केला आहे. पशू विभागानेही याकडे तात्काळ लक्ष केंद्रीत करून अशा कुत्र्यांवर वेळीच उपचार सुरु करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.  

ज्येष्ठ नागरिकही त्रस्त
गल्लोगल्ली मोकाट कुत्र्यांचे तांडेच्या तांडे रहात असल्याने महिला, शाळकरी मुले व ज्येष्ठ नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. दररोज सकाळ-संध्याकाळ ज्येष्ठ नागरिक विरंगुळा म्हणून फिरायला जातात. तर मुलांची याचदरम्यान शाळेच जाण्याची व येण्याची घाई असते. अशा वेळी समुहाने वावरत असलेले कुत्रे अनेकदा पादचाऱ्यांच्या अंगावर धावून जातात. कित्येकदा चावाही घेतलेला आहे. याकडे लोकप्रतिनिधींसह प्रशासनाचेही दुर्लक्ष होताना दिसत आहे.  

वेळीच उपचार करावेत
संसर्ग झालेल्या कुत्र्यांवर वेळीच उपचार न केल्यास अनेक कुत्र्यांवर आणि मानवी आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो, अशी भिती व्यक्त होतआहे. त्यामुळे वेळीच उपचार सुरु करून संभाव्य धोका टाळावा अशी मागणी प्राणीमित्रांसह परिसरातील खेड्यांमधील नागरिकांकडून होत आहे.

सध्या नांदेड शहरामध्ये खरूज झालेल्या कुत्र्यांची संख्या दिवसागणिक वाढत असून, याचा परिणाम पाळीव आणि मोकाट जनावरांसह मानवी आरोग्यावर सुद्धा होत आहे. तेव्हा संबंधित विभागाने याकडे वेळीच लक्ष देणे काळाची गरज आहे. 
- लिंगेश्‍वरअप्पा स्वामी (भावसार चौक)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com