School Student : चिखल, पाण्यातून वाट तुडवीत शाळेत चल रे दोस्ता..!

चिखलासह गुडघाभर पाण्यातून वाट तुडवीत चिमुकल्या विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागत असल्याचा प्रकार तालुक्यातील डोंगरगाव कवाड येथे पहावयास मिळतो.
Dongargav Kavad Village Students
Dongargav Kavad Village Studentssakal
Updated on

फुलंब्री - तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतवस्तीवर जाणाऱ्या रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. चिखलासह गुडघाभर पाण्यातून वाट तुडवीत चिमुकल्या विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागत असल्याचा प्रकार तालुक्यातील डोंगरगाव कवाड येथे पहावयास मिळतो. सुमारे वीस वर्षांपासून विद्यार्थी व शेतकऱ्यांना या रस्त्याहून जाताना कसरत करावी लागते. प्रशासनाने तत्काळ पुलासह रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांकडून होत आहे.

फुलंब्री शहरापासून पूर्वेला सहा किलोमीटरवर डोंगरगाव कवाड हे सुमारे दोन हजार लोकसंख्येचे गाव. या गावात पहिली ते सातवीपर्यंत शाळा आहे. पुढील आठवीचे शिक्षण घेण्यासाठी पाथ्री येथील राजर्षी शाहू महाविद्यालय किंवा फुलंब्री येथील संत सावता माळी महाविद्यालयात जावे लागते.

मात्र प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी डोंगरगाव कवाड येथील विद्यार्थ्यांना शेतवस्तीवरून शिक्षण घेण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागते. दीड ते दोन किलोमीटर या रस्त्यावर सातत्याने चिखल साचत असल्याने जाणाऱ्या-येणाऱ्या विद्यार्थ्यांसह शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो. याच रस्त्यावर गावालगत नाला असून या नाल्याला सध्या गुडघाभर पाणी आहे. याच पाण्यातून दररोज विद्यार्थ्यांना शाळेत यावे लागते.

पुराचा मोठा धोका

डोंगरगाव कवाड गावालगत डोंगर आहेत. जास्त पाऊस पडल्यानंतर नाल्याला मोठा पूर येतो. त्यामुळे पुराचे पाणी पाहून अनेक विद्यार्थ्यांना शाळेला दांडी मारावी लागते. मागील गेल्या वीस वर्षांपासून या रस्ता दुरुस्तीची मागणी येथील ग्रामस्थ करत आहे. परंतु, याकडे सातत्याने प्रशासन दुर्लक्ष करत आहे. याचा फटका विद्यार्थ्यांसह शेतकऱ्यांना बसत आहे.

रस्त्याचे पुलासह तत्काळ मजबुतीकरण करा

गावालगत असणाऱ्या शेतवस्तीवर जाण्या-येण्यासाठी दीड ते दोन किलोमीटर रस्त्याचे काम करावे, यासाठी ग्रामसभेने आतापर्यंत दहा ते बारा वेळेस ठराव घेतले. परंतु, प्रशासनाने रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. या रस्त्याचे पुलासह तत्काळ मजबुतीकरण करावे, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.

दळणवळणाचा गंभीर प्रश्न

डोंगरगाव कवाड येथील भोपळे वस्तीवर जाण्या-येण्यासाठी शेतकऱ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागतो. या रस्त्यावरून रोज दोनशेपेक्षा जास्त शेतकरी ये-जा करतात. शेतीकामासाठी जाताना महिलांची संख्या जास्त आहे. त्यामुळे दळणवळणाचा मोठा प्रश्न येथे निर्माण झाला आहे.

आतापर्यंत दहा ते बारा वेळेस ग्रामसभेतही रस्ता दुरुस्तीचे ठराव घेतले. परंतु, पुढे काही कार्यवाही झालीच नाही. या रस्त्याचे काम तत्काळ मार्गी लावावे, अन्यथा लोकशाही मार्गाने तहसील आणि त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विद्यार्थ्यांना सोबत घेऊन शाळा भरविण्यात येईल.

- अजित भोपळे, ग्रामस्थ, डोंगरगाव कवाड.

मला शाळेत जाण्यासाठी नाल्यामुळे पाच किमीचे अंतर जास्तीचे पार करावे लागते. पहिली व दुसरीच्या मुलांना शाळेत घेऊन जाणे खूप अवघड झाले आहे. कधीकधी तर आमच्या शाळेलाही चिखल व पाण्यामुळे दांडी पडते. त्यामुळे शैक्षणिक नुकसान होते.

- समृद्धी संजय भोपळे, विद्यार्थिनी.

दररोज शाळेत चिखलातून व गावाजवळ ओढ्यात पावसाचे पाणी असल्याने गुडघाभर पाण्यातून शाळेत जावे लागते. त्यामुळे या रस्त्याचे व पुलाचे काम झाले तर आम्हाला शाळेत जाण्यास अडचण येणार नाही.

- नागेश निवृत्ती भोपळे, विद्यार्थी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.