इच्‍छुक उमेदवारांना निवडणुकीचे वेध

photo
photo

कळमनुरी (जि. हिंगोली) : आगामी काळात तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी प्रशासनाकडून प्रभाग आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे आता इच्छुक उमेदवार निवडणूक लढविण्यासाठी सक्रीय झाले आहेत. दरम्यान, प्रसिद्ध झालेल्या आरक्षणावर आता दोन्ही बाजूंनी आक्षेप नोंदविले जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे गावपातळीवर राजकीय वातावरण तापले आहे.

तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतींसाठी आगामी काळात मतदान प्रक्रिया घेतली जाणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीकरिता निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या सुचनेप्रमाणे प्रशासनाकडून प्रभाग निश्चिती व आरक्षण निश्चित करण्यासाठी दिलेल्या मुदतीत कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार (ता. तीन) ते (ता. सहा) या काळात विशेष ग्रामसभा घेऊन आरक्षण काढण्यात आले आहेत. यामध्ये अनुसूचित जाती, जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण व महिलांसाठी जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. 

शुक्रवारपर्यंत आक्षेप घेता येणार

त्यानंतर शुक्रवारपर्यंत (ता. १४) प्रसिद्ध झालेल्या आरक्षण पद्धतीवर आक्षेप घेता येणार आहेत.
प्रशासनाकडे आतापर्यंत आखाडा बाळापूर, डोंगरकडा, डोंगरगाव पूल, बोथी, कोंढूर, जवळा पांचाळ, तोंडापूर, सापळी, माळेगाव, घोळवा, बऊर या ठिकाणांहून आरक्षण पद्धतीवर आक्षेप दाखल झाले आहेत. या आक्षेपात काही ठिकाणी काढण्यात आलेली आरक्षण चुकीच्या पद्धतीने असल्याचा आरोप करण्यात आला, तर याच ठिकाणी हे आरक्षण बरोबर असल्याच्या हरकतीही प्रशासनाकडे दाखल झाल्या आहेत. 

दोन्ही बाजूंनी आक्षेप

काही ठिकाणी वार्ड पुनर्रचना झाल्याशिवाय वार्ड आरक्षण करण्यात येऊ नये, काही गावांमधून अनुसूचित जमाती नागरिकांची मोठी संख्या आहे. या गावांमधून संख्येने कमी असलेल्या सर्वसाधारण नागरिकांसाठी जागाच आरक्षित केली नसल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. काही ठिकाणी ओबीसी प्रवर्गाचे प्राबल्य असतानाही या वार्डमधून अनुसूचित जातीचे आरक्षण काढण्यात आले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आखाडा बाळापूर ग्रामपंचायतीसाठी आरक्षण काढण्यात आल्यानंतर काही वार्डांचे आरक्षण चुकीच्या पद्धतीने काढण्यात आल्याचा आक्षेप दाखल झाला होता. 

ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची होणार 

मात्र, याच वेळी काढण्यात आलेले आरक्षण योग्य पद्धतीने काढण्यात आल्याच्या हरकती नागरिकांनी प्रशासनाकडे दाखल केल्या आहेत. एकंदरीत ग्रामपंचायत निवडणुकांना अवधी असतानाही गावपातळीवरील राजकीय वातावरण आतापासून तापण्यास सुरवात झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने प्रभाग निश्चिती ते प्रशासनाकडून आरक्षण प्रसिद्धीच्या नियोजित कार्यक्रमावर लक्ष ठेवून आपल्या हरकती व सूचना मांडण्यास प्राधान्य दिल्याचे चित्र आहे. त्यामुळे पुढील काळात होणारी ग्रामपंचायत निवडणूक अतिशय चुरशीची होणार असल्याचे संकेत आतापासूनच मिळत आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल

प्रसिद्ध झालेल्या नमूना ब आरक्षण पद्धतीवर दाखल झालेले आक्षेप उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अभिप्रायासह जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येणार आहेत. या अक्षेपांवर २१ मार्चपर्यंत जिल्हाधिकारी आपला अंतिम निर्णय देणार आहेत.
-कैलासचंद्र वाघमारे, तहसीलदार

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com