कोरोनाला रोखण्यासाठी सव्वापाच कोटी, लातूर जिल्हा नियोजन समितीचा निर्णय

Latur District Planning Committee, Latur News
Latur District Planning Committee, Latur News
Updated on

लातूर : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा नियोजन समितीने (डीपीसी) जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांना साडेपाच कोटी रूपयाचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीमुळे यंत्रणांना विविध व तातडीच्या उपाययोजना करणे शक्य झाले आहे. इतर जिल्ह्याच्या तुलनेत समितीने जास्त निधी दिला असून राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री व पालकमंत्री अमित देशमुख यांनी जादा निधीसाठी सूचना दिल्या होत्या.


जिल्ह्यात अद्याप एकही कोरोनाबाधित रूग्ण आढळून आला नसला तरी भविष्याचा विचार करून कोरोनाला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध उपायोजना करत आहे. यात आरोग्य विभागाकडून राबवल्या जाणाऱ्या उपाययोजनांना महत्व आहे. त्यासाठी तातडीने निधी मिळणे शक्य नसल्याने जिल्हा नियोजन समितीने निधी मंजूर केला आहे. वार्षिक आराखड्याच्या पाच टक्के निधी आकस्मिक कारणासाठी खर्च करता येतो. जिल्ह्याच्या वार्षिक आराखडा २३२ कोटींचा आहे. यामुळे आणखी निधी उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे. तूर्त सव्वा पाच कोटींचा निधी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था, जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना विभागून देण्यात येणार आहे.

यात विज्ञान संस्थेकडून विलगीकरण कक्षाची स्थापना करण्यासह खाटांची संख्या वाढवण्यात येत आहे. यासोबत अन्य सुविधांही उपलब्ध करण्यात येत आहे. जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाला दोन कोटींचा निधी मिळणार असून यातून व्हेंटीलेटर, पीपीकीट, ऑक्सीजन कॉन्सनटेटर तसेच बायपॅप यंत्राची खरेदी करण्यात येणार आहे. यातील काही साहित्याचा पुरवठा विज्ञान संस्थेलाही करण्यात येणार आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी ऑक्सिजन कॉन्सनटेटर व बायपॅप यंत्राची खरेदी करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.  

लातूरात किराणा दुकानदारांनी वाढवले भाव
'कोरोना'चे संकट सगळीकडे पसरलेले असताना अशा अडचणीच्या काळात लातुरातील किराणा दुकानदार आणि काही भाजीपाला विक्रेत्यांनी चक्क भाव वाढवत चढ्या दराने जीवनावश्यक वस्तू विकायला सुरवात केली आहे. त्यामुळे माणुसकी शिल्लक आहे की नाही, अशी चर्चा ग्राहकांमध्ये होत आहे. काही ग्राहकांनी तर याबाबतच्या तक्रारी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्या आहेत. याची त्यांनी दखल घेत 'अशा दुकानदाराचे परवाने रद्द करा' अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. दरम्यान, शहरातील औषधी दुकाने २४ तास उघडी राहत नसल्याचेही समोर आले आहे.


'कोरोना'चा फैलाव रोखावा म्हणून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अशा काळात नागरिक किराणा दुकान, सुपर मार्केट, मॉल येथे जीवनावश्यक वस्तूंची मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. या संधीचा फायदा घेत काहींनी चढ्या दराने विक्री करायला सुरवात केली आहे. हा गैरप्रकार लातुरातील सुजाण नागरिकांनी प्रशासनाला दाखवून दिला आहे. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या 'फेसबुक लाईव्ह'मध्येही याबाबतच्या तक्रारी नागरिकांनी त्यांना सांगितल्या.


जी. श्रीकांत म्हणाले, काही संधीसाधू लोक संकटाच्या काळात चढ्या दराने मालाची विक्री करत आहेत, अशा तक्रारी आमच्याकडे येत आहेत. असे प्रकार आमच्या पाहणीत आढळून आले तर तातडीने त्यांचा परवाना आम्ही रद्द करून टाकू. त्यांचे दुकान ताब्यात घेऊन तेथे कर्मचारी नेमून मालाची योग्य भावात विक्री केली जाईल. असे दुकानदार पुढचे १८ दिवसच नव्हे तर यापुढे कधीच मालाची विक्री करू शकणार नाहीत, अशी व्यवस्था आम्ही करू. औषधी दुकाने २४ तास उघडी राहिली पाहिजे. पण काही दुकाने बंद होताना दिसत आहेत. असे होता कामा नये.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com