बाजारसावंगी येथील पाच बसफेऱ्या बंद

बाजारसावंगी येथील पाच बसफेऱ्या बंद

बाजारसावंगी (जि.औरंगाबाद ) ः जैतखेडा (ता.कन्नड) येथील कन्नड-फुलंब्री या जिल्हा मुख्य मार्गावरील जैतखेडा गावाअंतर्गत रस्त्याचे कॉंक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तसेच तेथील ग्रामपंचायतीने पर्यायी वळण रस्ता उपलब्ध करून न दिल्याने रविवारपासून (ता.सहा) राज्य परिवहन महामंडळाच्या कन्नड आगाराच्या कन्नड-बाजारसावंगीमार्गे फुलंब्री अशा दिवसभराच्या पाच बस फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत.


शिक्षणासाठी फुलंब्री-औरंगाबाद येथे येणाऱ्या-जाणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे प्रवाशांना देखील खासगी वाहतुकीच्या पर्यायाला सामोरे जावे लागत आहे. वर्तमानपत्रांचे पार्सल प्रतिनिधींना फुलंब्रीला जाऊन आणावे लागत आहे. बाजारसावंगी हे खुलताबाद तालुक्‍यातील डोंगराळ भागातील मुख्य बाजारपेठेचे गाव असून 35 गावे जोडली गेली आहेत. राष्ट्रीयीकृत बॅंक, सहकारी बॅंक, तीन नामवंत पतसंस्था, शालेय शिक्षणासह माध्यमिक विद्यालय व महाविद्यालयीन पदवी व पदव्युत्तर शिक्षण देणाऱ्या नऊ संस्था, इंग्रजी माध्यमाच्या पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळा, 28 गावांचे प्राथमिक आरोग्य केंद्र, 25 गावांचे महावितरण केंद्र, अनेक गावांच्या पोलिस चौक्‍या, 36 गावांचे विषयक टपाल कार्यालय, महसूल प्रशासनाचे मुख्य मंडळ अशा अनेक कारणांनी दररोज जनतेच्या व्यवहाराशी निगडित मुख्य गाव आहे.

मात्र खुलताबाद तालुक्‍यात एसटी महामंडळाचा आगार नसल्याने कोणत्यातरी आगाराला हा भाग दत्तक द्यावा अशी स्थिती आहे. या भागात यापूर्वी चांगले रस्ते नसताना देखील एकेकाळी सिल्लोड, गंगापूर, औरंगाबाद, कन्नड आगाराच्या दररोज मुक्कामी गाड्या राहायच्या. एवढेच नव्हे आठवडे बाजाराला जास्त बसफेऱ्या जायच्या. वैजापूर आगाराची खुलताबाद बाजारसावंगी फाटा, फुलंब्री परतीसह बससेवा सुरळीत होती. सध्या दरेगाव बस औरंगाबाद आगाराची टपालसेवा बस फेरी असूनही ती कधी पितृपक्ष अमावास्या, पौर्णिमा निमित्ताने बंद पडत असते.

कन्नड आगाराच्या पाच बस फेऱ्या बंद झाल्याने या भागातील प्रवासी सेवा पूर्णतः कोलमडली आहे. वर्षभरापासून कन्नड आगाराच्या करंजखेड, पिशोर, बाजारसावंगी, औरंगाबाद अशा दोन फेऱ्या देखील बंद पडलेल्या आहेत. जैतखेडाच्या सरपंचांनी कन्नड आगाराला लेखी निवेदन दिले. प्रवासी जनतेला आंदोलनाच्या मार्गाशिवाय अन्य पर्याय नाही. कन्नड आगाराचे वाहतूक नियंत्रक एस.के.पगारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी जैतखड येथील गावातील रस्त्याचे काम सुरू असल्याने बससेवा बंद आहे, असे सांगितले. रस्ता उपलब्ध होईल तेव्हा फेऱ्या सुरू होतील. विद्यार्थ्यांना पास असूनही आर्थिक भुर्दंड सवलत धारक प्रवाशांना अधिकचा प्रवास खर्च व वेळेचे बंधन अशा विद्यार्थी-विद्यार्थिनींना अडचणींना सामोरे जावे लागते. यासाठी औरंगाबाद आगाराने औरंगाबाद बाजारसावंगी जैतखेडा व परत औरंगाबाद अशा तात्पुरत्या नवीन बसफेऱ्या सुरू कराव्यात अशी या भागातील ग्रामस्थांची मागणी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com