Water Shortage : घनसावंगीत हिवाळ्यातच पाणी टंचाईचे चटके; नद्या, विहिरींनी गाठला तळ

यंदा घनसावंगी तालुक्‍यात अत्यल्प पावसामुळे नोव्हेंबर महिन्यांच्या पहिल्या आठवड्यातच ग्रामीण भागाला पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत आहेत.
Water supply by tankers
Water supply by tankersesakal

घनसावंगी - यंदा घनसावंगी तालुक्‍यात अत्यल्प पावसामुळे नोव्हेंबर महिन्यांच्या पहिल्या आठवड्यातच ग्रामीण भागाला पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत असून विहिरींनी तळ गाठला तर कूपनलिकांची पाणीपातळी घटली आहे. यांचा परिणाम पिण्याच्या पाण्यावर जाणवत असून ग्रामीण भागात पाणीटंचाईची समस्या दूर करण्यासाठी प्रशासनाकडून मोठी उपाययोजना करण्याची गरज आहे.

यंदा केवळ ४७५.८० मिलिमीटर पाऊस (६६.३६ टक्के) झाला. तालुक्‍यातील दुधना नदी कोरडीठाक पडली आहे. सिंचन प्रकल्पांनी तळ गाठला तर काही कोरडे पडले आहेत. याचा परिणाम म्हणून त्या परिसरातील पाण्याचे सर्व स्रोत आटले. त्यातच विहिरींनी यंदा हिवाळ्याच्या सुरवातीसच तळ गाठला आहे.

ऑक्‍टोबर महिन्यात विहिरीच्या पाण्याच्या पातळीचा अभ्यास करून वरिष्ठ भूवैज्ञानिक यांनी ऑक्‍टोबर ते डिसेंबर २०२३ या कालावधीत, जानेवारी ते मार्च २०२४ या कालावधीत मानेपुरी, राणी उंचेगाव, कृष्णनगर, चापडगाव, अंतरवालीदाई, देवडी हादगाव, माहेरजवळा, साकळगाव, हातडी, मासेगाव, बोधलापुरी, मोहपुरी, सिद्धेश्वर पिंपळगाव, बाचेगाव, वडीरामसगाव, राहेरा, दैठणा खुर्द, जोगलादेवी, तीर्थपुरी, मुरमा खुर्द, बळेगाव, राजेगाव, ढाकेफळ, दहीगव्हाण बुद्रूक, पाडळी बुद्रक, पाडळी खुर्द, अरगडेगव्हाण, राजूरकरकोठा, मंगरूळ, मुद्रेगाव, बानेगाव, भोगगाव, सौंदलगाव बुद्रक, रामसगाव, शेवता, एकरुखा, राजा टाकळी, शिवणगाव, उक्कडगाव या गावांत भीषण पाणीटंचाईची शक्‍यता व्यक्त केली आहे.

यंदा गावातील पाणीटंचाईची परिस्थिती पाहता गावातून आलेल्या मागणीनुसार उपाययोजनेसंबंधी ग्रामपंचायतीकडून प्रस्ताव मागवून, या प्रस्तावाला मंजुरी मिळवून पाणीपुरवठा विभाग उपाययोजना करण्याचा प्रयत्न करीत आहे.

- एल.जी. राठोड, पाणीपुरवठा विभाग, पंचायत समिती, घनसावंगी

टॅंकरची प्रतीक्षा

ग्रामीण भागात टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच गावांजवळील सर्वच पाण्याचे स्रोत आटल्याने आता पाण्याच्या टॅंकर गावात केव्हा येतो याची प्रतीक्षा नागरिकांना असते. टॅंकर गावात आले की ग्रामस्थ पाण्याचे हंडे घेऊन टॅंकरच्या मागे धावत असल्याचे चित्र आहे.

या गावांत उपाययोजना

देवळीपरतूर, गुणानाईक तांडा, रांजणी, डहाळेगाव, डहाळेगाववाडी, बाचेगाव, बोररांजणी, वडीरामसगाव, देवळी अंबड येथे खाजगी विहीर अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. बोरगाव खुर्द गावांतर्गत तीन तांडे, बोरगाव खुर्द, अंतरवाली राठी अंतर्गत शिवनगर, मासेगाव, शेवगळ, कंडारी, परतूर, येवला या सात गावांत प्रत्येकी दोन टॅंकरच्या खेपा सुरू करण्यात आल्या आहे.

ग्रामीण भागात टॅंकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात येत असला तरी प्रत्येक गावात शासनाने ठरवून दिलेल्या फेऱ्या टॅंकरद्वारे व्हाव्यात. त्याचबरोबर गावातील पाणी टंचाईची झळ यंदा हिवाळ्यातच जाणवू लागल्याने गावात उपाययोजना करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून आलेल्या सूचना व प्रस्तावांची तातडीने प्रशासनाकडून अंमलबजावणी करण्यात यावी.

- दत्तात्रय वराडे, सरपंच, वडीरामसगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com