शेतकऱ्यांसाठी खूशखबर, बेबाकी प्रमाणपत्राची गरज नाही

pikkarj
pikkarj

परभणी : खरीप हंगामातील पीककर्ज वाटपाची प्रक्रिया सुरू झाली आहे. २०२०-२१ सुलभ पीककर्ज वाटपासाठी विशेष अभियान हाती घेण्यात येणार आहे. पीककर्जासाठी आता अन्य बॅंकेच्या बेबाकी प्रमाणपत्राची गरज नाही, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी दिली आहे.

पीककर्ज वाटपासंदर्भात जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी सर्व बॅंक प्रतिनिधींची (ता. दोन) बैठक घेऊन राज्य शासनाने दिलेल्या सूचनांची माहिती दिली आहे. शासनाच्या सुचनेनुसार आता एक लाख ६० हजारांपर्यंतच्या पीककर्जासाठी इतर बँकांचे बेबाकी प्रमाणपत्र घेण्याची आवश्यकता राहिली नाही. त्याऐवजी शेतकऱ्यांचे स्वयंघोषणा पत्र घेण्यात यावे, अशी सूचना दिली आहे. नवीन शेतकऱ्यांना तत्काळ अल्प मुदतीचे पीककर्ज वाटप व्हावे, पीककर्ज मागणीचे अर्ज ग्रामपंचायत कार्यालयात जमा करावे, ते बॅंकेला देऊन तत्काळ संबंधित बँकांनी पीककर्ज वाटप करावे, कर्ज वाटपासंदर्भात जनजागृती करावी, जून महिना संपेपर्यंत पात्र कर्जदारांना पीककर्ज वाटप करावे, किसान क्रेडिट कार्डचे तत्काळ वाटप करावे, ज्यांच्याकडे किसान क्रेडिट कार्ड आहे अशांना पीककर्जासह पशुपालन, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय आदींसाठी कर्ज द्यावे, अशा प्रकारचे निर्देश बॅंकांना देण्यात आल्याची माहिती श्री. सुरवसे यांनी दिली.

पात्र शेतकऱ्यांना जूनपूर्वी कर्ज वाटप करा
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ आणि महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती २०१९ योजनेचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना नव्याने पीककर्ज मिळावे हा या योजनेचा उद्देश आहे. त्यामुळे सर्व बॅंकांनी पात्र शेतकऱ्यांना जून महिना संपेपूर्वी कर्ज वाटप करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी बॅंकांना दिल्याची माहिती श्री. सुरवसे यांनी दिली.

कर्ज वाटपात जिल्हा बँक आघाडीवर
जिल्ह्यातील बॅंकाना खरीप हंगाम एक हजार ५६७ कोटी २० लाख रुपयांचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यामध्ये व्यापारी बँकांना एक हजार १७५ कोटी ६६ लाख रुपयांचे उद्दिष्ट आहे. परंतु, त्यांनी आतापर्यंत केवळ ८६७ शेतकऱ्यांना आठ कोटी ४३ लाख एवढेच कर्ज वाटप केले असून ती टक्केवारी ०.७२ एवढी आहे. ग्रामीण बॅंकेला २२५ कोटी २९ लाख रुपये कर्जवाटपाचे उद्दिष्ट आहे. त्या बॅंकेने एक हजार ६५३ शेतकऱ्यांना ११ कोटी ५८ लाख (५.१४) एवढे कर्ज वाटप केले आहे. तर जिल्हा मध्यवर्ती बँकेला १६६ कोटी २६ लाख रुपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. या बॅंकेने कर्ज वाटपाची प्रक्रिया वेगात चालवली आहे. आतापर्यंत जिल्हा बॅंकेने ३५ हजार ६४२ शेतकऱ्यांना ११२ कोटी आठ लाख ५४ हजार रुपयांचे (६७.४२) पीककर्ज वाटप केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com