आनंदाची बातमी: परभणी कोरोनामुक्त

file photo
file photo

परभणी : परभणी जिल्ह्यातील एकमेव कोरोनाग्रस्त युवकाचा तिसरा स्वॅब अहवालही निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे परभणी जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे असेच म्हणावे लागेल. या युवकांचा स्वॅब अहवाल सोमवारी (ता. २७) सकाळी जिल्हा रुग्णालयास प्राप्त झाला आहे.
परभणी जिल्ह्यात ता. १३ एप्रिल रोजी हिंगोली जिल्ह्यातून परभणीत पाहुणा म्हणून आलेल्या एका २१ वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचे त्याच्या तपासणी अहवालात नमूद केले होते. त्यामुळे या युवकाला परभणीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू होते. तो त्याच्या पाच नातेवाइकांसह इतर नऊ जणांच्या संपर्कात आला होता. त्या सर्वांना कॉरंटाइन करण्यात आले होते. त्या सर्वांचे दोन अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तरुणांचा शनिवारी दुसरा स्वॅब अहवाल घेतला होता. तोदेखील निगेटिव्ह आला होता. त्यानंतर २४ तासांत दुसरा स्वॅब घेऊन तो तपासणीसाठी औरंगाबाद येथे पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल सोमवारी सकाळी प्राप्त झाला आहे. हा अहवाल निगेटिव्ह आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.

लोकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे
 परभणी जिल्हा कोरोनामुक्त झाला असला तरी लोकांनी काळजी घ्यावी. सोशल डिस्टन्सिंगचे पालन तंतोतत करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केले आहे.

हेही वाचा...

वसतिगृहातील देखभालीने झाले भाऊक......
सेलू (जि. परभणी):
 लॉकडाउन, संचारबंदी, सीमा बंदीमुळे राज्यातील व परराज्यातील जवळपास  ६५ प्रवासी सेलू शहरातील श्रीरामजी भांगडिया वसतिगृहाच्या निवारा कँपमध्ये २८ मार्चपासून अडकले होते. या ६५ जणांपैकी  राज्यातील ४१ नागरिकांना रवाना करण्याच्या परवानगीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्याकडे तहसीलदार बालाजी शेवाळे यांनी पाठविला होता. या प्रस्तावास जिल्हाधिकारी मुगळीकर यांची मान्यता मिळताच शुक्रवारी (ता. २४) रात्री साडेसात वाजता सातारा, यवतमाळ, जालना, नाशिक व  हिंगोली येथील ४१ नागरिकांना खासगी वाहनाद्वारे त्यांच्या गावी सोडण्यात आले. 
या वेळी उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, तहसीलदार बालाजी शेवाळे, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संजय हरबडे, तालुका आरोग्य अधिकारी रावजी सोनवणे, नूतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, महाविद्यालयचे तथा या कॅम्पचे परीवेक्षक प्रा. नागेश कान्हेकर, तलाठी मुकुंद अष्टीकर, राम मैफळ, गिरीष लोडाया, अमर जोरगेवाड, प्रा. महेश कुलकर्णी यांच्यासह पाठविण्यात आलेले एका तुकडीतील नागरिक उपस्थित होते.
 जिल्हाधिकारी यांच्याकडे रवाना होण्यासाठीचा प्रस्ताव परवानगीसाठी  गेलेला कळताच महिनाभरापासून शहरातील विविध सामाजिक संघटना, संस्था व नागरिकांनी केलेल्या सेवेमुळे समाधानी असलेल्या या नागरिकांना घराची ओढ लागली होती. दरम्यान, रवाना होणाऱ्या गाडीत बसताना संबंधित नागरिकांनी आपल्याला करण्यात आलेल्या पाहुणचाराचे स्मरण होताच ते भाऊक झाले. जड अंतकरणाने सेलूकरांचा निरोप या सर्वांनी घेतला. 

तपासणीनंतरच रवानगी 
लाॅकडाउन व संचारबंदी व सीमाबंदी  प्रवासा दरम्यान, अडकलेल्या राज्यातील विविध ठिकाणच्या या सर्व नागरिकांची तपासणी उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक डॉ. संजय हरबडे यांनी केली होती. तसेच या सर्वांना १४ दिवसांपेक्षा जास्त विलगीकरणाचा कालावधीदेखील झाला होता. प्रकृती व्यवस्थित असल्यामुळे प्रशासनाच्या वतीने या सर्वांची रवानगी करण्यात आली.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com