अस्मानी संकटाने गिळली द्राक्षबाग 

तीर्थपुरी (ता. घनसावंगी) : शेतकरी नारायण बोबडे यांच्या द्राक्षबागेवर कुऱ्हाड चालविताना. 
तीर्थपुरी (ता. घनसावंगी) : शेतकरी नारायण बोबडे यांच्या द्राक्षबागेवर कुऱ्हाड चालविताना. 

तीर्थपुरी (जि. जालना) -  शेतकरी उत्पादन वाढविण्यासाठी शेतीत नवनवीन प्रयोग करत आहेत. या भागात मोसंबी, डाळिंब या फळबागांबरोबर द्राक्षबागेचे क्षेत्र वाढत आहे. परंतु गेल्या तीन-चार वर्षांपासून शेतीचे गणित बिघडल्याने अनेक प्रयोगशील शेतकऱ्यांतही नैराश्‍य निर्माण झाले आहे. दरम्यान, कधी कोरड्या तर कधी ओल्या दुष्काळामुळे येथील शेतकरी नारायण बोबडे या शेतकऱ्याने नैराश्‍यातून साडेतीन एकरांतील द्राक्षबागेवर कुऱ्हाड चालवली आहे. 

गेल्या तीन-चार वर्षांपासून शेतीव्यवसायात सतत दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. घनसावंगी तालुक्‍यातील तीर्थपुरी भागात मोसंबी, डाळिंब व द्राक्षबागेच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला आहे. अनेक शेतकरी फळबागेवर मोठ्या प्रमाणात खर्च करत आहेत. परंतु सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे या बागेचे लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. 

चार वर्षांपूर्वी लावली बाग 
तीर्थपुरी येथील नारायण बोबडे यांनी गेल्या चार वर्षांपूर्वी मोठ्या हिमतीने द्राक्षबागेची साडेतीन एकरांत लागवड केली. लागवडीनंतर दोन वर्षांनी या बागेचे उत्पादन सुरू झाले. पहिल्या वर्षी या बागेपासून पाच लाख रुपयांचे उत्पादन मिळाले. दुसऱ्या वर्षी नऊ लाख रुपयांचे उत्पादन मिळाले. गतवर्षी या बागेपासून चांगले उत्पादन होईल या आशेने मोठ्या प्रमाणात खर्च केला परंतु ऐन बहरात आलेल्या बागेला दुष्काळाचा फटका बसला. बहरलेल्या बागेला पाणी कमी पडू लागल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

12 ते 15 लाख रुपयांचे नुकसान
गतवर्षीच्या दुष्काळाचा सामना करत यंदाही चांगली बाग बहरली. यापासून चांगले उत्पादन होईल अशी आशा होती. परंतु परतीच्या पावसाने या आशेवर पाणी फिरले. यंदा बागेपासून 12 ते 15 लाख रुपयांचे नुकसान सोसावे लागले. त्यामुळे या शेतकऱ्यांनी या द्राक्षबागेवर कुऱ्हाड चालवली.

गतवर्षीच्या दुष्काळामुळे झालेले नुकसान यंदाच्या द्राक्षबागेपासून भरून निघेल असे वाटत होते. गतवर्षी पाण्याअभावी आणि यंदा पाण्यामुळे या बागेचे नुकसान झाले. गतवर्षी व यावर्षी मोठ्या प्रमाणात बागेवर खर्च केला. गतवर्षी पाण्याअभावी व यंदा पाण्यामुळे बागेचे नुकसान झाले. खर्च निघणेही कठीण झाले. त्यामुळे मानसिक तणावातही भर पडत गेली. परिणामी वैतागून साडेतीन एकरांतील बागेवर कुऱ्हाड चालवावी लागली. 
- नारायण बोबडे, 
शेतकरी, तीर्थपुरी. 
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com