बीड: पुन्हा पावसाचा तडाखा, काढणीला आलेले सोयाबीनचे नुकसान

कपाशीही काळवंडली, मांजरा, माजलगाव धरणातून विसर्ग
बीड: पुन्हा पावसाचा तडाखा, काढणीला आलेले सोयाबीनचे नुकसान
sakal

बीड : मागील १५ दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे नदी, नाल्यांसह छोटीमोठी धरणे तुडुंब भरून वाहू लागली तर, शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचेही मोठे नुकसान झाले होते. महसूल विभागामार्फत नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामेही अद्याप पूर्ण झाले नसताना गुरुवारी (ता. २३) मध्यरात्री पावसाने पुन्हा तडाखा दिला.

बीड: पुन्हा पावसाचा तडाखा, काढणीला आलेले सोयाबीनचे नुकसान
औरंगाबाद : दुमजली माळद कोसळून आजोबा व नात ठार

जिल्ह्यातील अंबाजोगाई, केज तालुक्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे काढणीला आलेले सोयाबीन पाण्यात वाहून गेले आहे तर, कापसाचे पीकही काळवंडून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील मांजरा, माजलगाव धरणाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

ऑगस्ट महिन्यात जवळपास महिनाभर दडी मारलेल्या पावसाने सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून कोसळायला सुरुवात केली आहे. ता. पाच ते आठ सप्टेंबर दरम्यान बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. यामुळे नदी, नाले खळखळून वाहू लागले तर, बीड जिल्ह्यातील माजलगाव, मांजरा, बिंदुसरा यासारखी मोठी धरणे तुडुंब भरून ओसंडून वाहत आहेत.

या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन, मूग, कापूस, उडीद यासारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल प्रशासनाला दिले आहेत. प्रशासनाकडून पिकांच्या पंचनाम्याचे काम सुरु असून अद्यापपर्यंत जवळपास ६५ टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत.

जवळपास अर्ध्या पिकांचे पंचनामे राहिलेले असताना गुरुवारी (ता. २३) मध्यरात्री जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत पुन्हा मुसळधार पाऊस बरसला. यात अंबाजोगाई, केज, धारूर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्याने काढणीला आलेले सोयाबीन पाण्यात वाहून गेले आहे.

अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतात तळे साचल्याने सोयाबीन, कापूस, तूर यासारख्या पिकांचे पूर्णतः नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला असून हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. जिल्ह्यात गुरुवारी (ता.२३) रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला. मांजरा धरणाचे १२ दरवाजे उघडण्यात आल्याने नदीला आलेल्या पुरामुळे धानोरा, तट बोरगाव, आपेगाव रस्ता बंद झाल्याने वाहतूक ठप्प झाली होती.

येथे झाली अतिवृष्टी

गुरुवारी रात्री जिल्ह्यातील अंबाजोगाई, केज, धारूर तालुक्यातील अनेक महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. अंबाजोगाई मंडळात ६१ मिलिमीटर, पाटोदा (म.) १४५.३ मिलिमीटर, लोखंडी सावरगाव ६८.३ मिलिमीटर, केज ९३ मिलिमीटर, युसुफ वडगाव ९६.८ मिलिमीटर, होळ ८७.५ मिलिमीटर, नांदूरघाट ७० मिलिमीटर, बनसारोळा ५९ मिलिमीटर, सिरसाळा ८७.३ मिलिमीटर, धारूर ६३ मिलिमीटर, मोहखेड मंडळात ७७.५ मिलिमीटर एवढा पाउस पडल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

मांजरा, माजलगाव धरणाचे दरवाजे उघडले

बीड जिल्ह्यातील मांजरा, माजलगाव या दोन मोठ्या धरणाच्या पाणलोटक्षेत्रात गुरुवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे दोन्ही धरणाचे दरवाजे उघडून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आला आहे. मांजरा धरणाचे सहा तर, माजलगाव धरणाचे नऊ दरवाजे उघडून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com