पैठणी, हिमरू, बिदरीच्या वारशाने समृद्ध औरंगाबाद; हिमरू फॅक्टरीतील हेरिटेज वॉक उत्साहात

heritage walk in aurangabad himru factory
heritage walk in aurangabad himru factory

औरंगाबाद : एकेकाळी थेट रोमन साम्राज्याचा पैसा व्यापाराद्वारे भारतात खेचून आणण्याची क्षमता असलेले महावस्त्र 'पैठणी', औरंगाबादचे प्रसिद्ध हिमरू विणकाम आणि बिदरी कलेचा इतिहास व निर्मितीतंत्र इतिहासप्रेमींना रविवारी (ता. 15) हेरिटेज वॉकच्या निमित्ताने उमगले.

औरंगाबाद हिस्ट्री सोसायटीतर्फे या महिन्यातील हेरिटेज वॉक शहरातील सर्वात जुन्या हिमायतबाग चौकातील हिमरू फॅक्टरीमध्ये घेण्यात आला. याठिकाणी इतिहास संशोधक रफत कुरेशी, डॉ. दुलारी कुरेशी यांनी पैठणी, हिमरू आणि बिदरी कलांचा इतिहास उलगडून सांगितला. यावेळी उपस्थित हिमरू कारागीर आमेर अहमद कुरेशी, इमरान अहमद कुरेशी, पैठणीचे विणकर लायक बिलग्रामी आणि बिदरी कारागीर विजय गवई यांनी आपापल्या कलांचे प्रात्यक्षिक दाखवून या कामाची माहितीही उपस्थित इतिहासप्रेमी नागरिकांना दिली. 

सुलतान महंमद तुघलकाने जेव्हा आपली राजधानी दिल्लीहून दौलताबादला आणली, त्यावेळी त्याच्यासोबत शेकडो विणकर इथे आले. त्यांनी हिमरू कला प्रसिद्ध केली. काही वर्षात जेव्हा तो परत गेला, तेव्हा हे कारागीर इथेच स्थिरावले आणि हिमरू ही औरंगाबादची ओळख बनली. सोन्याचांदीच्या जरीने विणलेल्या हिमरू शालींमध्ये गुलबदन, तितरपंखी, गुलदस्ता, इत्यादी डिझाईन्स प्रसिध्द आहेत, असे त्यांनी सांगितले. मूळच्या अरेबिया आणि पर्शिया येथून आलेली आणि बिदरला केंद्रस्थानी ठेवून भारतभर पसरलेली बिदरी कला आज लुप्त होत आहे. जस्त आणि तांब्याच्या मिश्रणातून बनवलेल्या भांड्यांवर कोरीवकाम करून सोन्याचांदीच्या डिझाईन्स बनवून बिदरी भांडी बनवली जात, असेही श्री. कुरेशी यांनी सप्रयोग दाखवले.

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणचे उपअधीक्षक डॉ. शिवाकांत वाजपेयी, हिस्ट्री सोसायटीच्या सचिव डॉ. बिना सेंगर, द्वारकादास पाथ्रीकर, ज्ञानप्रकाश मोदाणी, समाजशास्त्रज्ञ डॉ. स्मिता अवचार यांच्यासह रॉयल ओक्स शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, इतिहास संशोधक आणि नागरिक उपस्थित होते.

रोमच्या पतनाचे एक कारण
इसवी सन पूर्व पाचव्या ते सहाव्या शतकापासून जगभर प्रसिद्ध असलेल्या पैठणीचा उल्लेख पाणिनीच्या अष्टाध्यायी ग्रंथात, जुन्या बौद्ध साहित्यात मिळतो. अश्मक जनपदाचे काळापासून चालत आलेल्या या साळी आणि कोष्टी लोकांच्या या कारागिरीला सातवाहनांनी प्रोत्साहन दिले. पैठणहून थेट रोमपर्यंत पोहोचलेली पैठणीची कीर्ती हे या विशाल साम्राज्याच्या पतनाच्या अनेक कारणांपैकी एक कारण होते, असा दावा डॉ. दुलारी कुरेशी यांनी केला. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी पैठणी साड्या, दख्खनी मलमल याच्या बदल्यात रोमहून वर्षाकाठी तब्बल आठ लाख पौंड भारतात येत असत. इतके पैसे रोमन लोक पैठणीवर खर्च करत होते. तिथल्या राज्यकर्त्यांनी अखेर यावर अंकुश लावण्यास सुरुवात केली होती, असे त्यांनी सांगितले. अजिंठा लेणीच्या 1, 16 आणि 17व्या लेणीत पैठणीचे संदर्भ मिळतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com