
हिंगोली : शेतकऱ्याचे नगदी पीक म्हणून समजल्या जाणाऱ्या सोयाबीन कापणीला दोन दिवसांपासून चांगलीच गती आली आहे. पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी रात्रंदिवस सोयाबीन कापून घेण्याची कामे करीत असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहवयास मिळत आहे. यामुळे मजुरांच्या हाताला काम लागले मात्र उतारा घटल्याचे शेतकरी सांगत आहेत.
कोरोनामुळे मागील सहा महिन्यांपासून हाताला काम नसलेल्या मजुरांना सोयाबीन कापणीची वाढीव मजुरी मिळत आहे. मजूरही रात्रंदिवस सोयाबीन कापणी करत आहेत. तर कापून टाकलेली सोयाबीन मळणीयंत्रातून काढून घेण्यासाठी देखील शेतकऱ्यांची लगीनघाई सुरू असल्याचे सध्या चित्र आहे.
जिल्ह्यांमध्ये साडेतीन लाख हेक्टर क्षेत्रापैकी अडीच लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. यावर्षी खरीप पेरणीच्या सुरुवातीपासूनच जोरदार पाऊस असल्याने सोयाबीनची वाढ बऱ्यापैकी झाली. मात्र, शेतामध्ये साचलेल्या पाण्यामुळे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये सोयाबीन अक्षरश: सडून गेलेले आहे. तरी देखील कसेबसे निसर्गाच्या अवकृपेनेतून वाचलेले सोयाबीन पारंपरिक पद्धतीने कापून घेण्याची कामे शेतकरी करत आहेत.
नुकसानग्रस्त भागात प्रशासनस्तरावर अजूनही पंचनामे करण्यात आलेले नाहीत
वास्तविक पाहता यावर्षी सोयाबीनची वाढही चांगली झाली होती. त्यामुळे सोयाबीनची कापणी ही हार्वेस्टरने करण्याच्या तयारीत अनेक शेतकरी लागले होते. मात्र, शेतात साचलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. नुकसानग्रस्त भागात प्रशासनस्तरावर अजूनही पंचनामे करण्यात आलेले नाहीत. अनेक भागामध्ये उभ्या सोयाबीनच्या शेंगांना कोंब फुटलेले आहेत. तरीही शेतकऱ्यांना सोयाबीन कापण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे.
मजुरांना प्रति दिवस ३०० ते ३५० रुपये मजुरी
मजुरांना प्रति दिवस ३०० ते ३५० रुपये मजुरी मिळत आहे.तर एका बॅग काढणीला सरासरी दोन हजार चारशे ते दोन हजार पाचशे रुपये मजुरी घेत आहेत. बऱ्याच मजुरांनी सोयाबीनच्या काढण्यासाठी गुत्ते घेतलेले आहे. निसर्गाचा समतोल बघून मजूर गतीने सोयाबीनची कापणी करत आहेत. मात्र ओले सोयाबीन असल्याने यंदा भावदेखील कमी मिळेल, अशी चिंता शेतकऱ्यांनी वाटत आहे.
बाजारात सोयाबीन ३२०० ते ३४०० रूपये प्रमाणे भाव मिळत आहे
मजुरांना कामे मिळाली आहेत मात्र एका बँगला चार ते पाच क्विंटलपर्यंत उतारा येत आहे. दरम्यान एका बँगला सरासरी आठ ते दहा क्विंटलचा उतारा येतो मात्र यावर्षी पावसाने उत्पन्न घटल्याचे शेतकरी सांगत आहेत. बाजारात सोयाबीन ३२०० ते ३४०० रूपये प्रमाणे भाव मिळत आहे. परंतु लागवड, बियाणे, निंदणी, खताची मात्रा याचा विचार केल्यास हाच खर्च अधिक असल्याचे गणेश खंडागळे यांनी सांगितले.
संपादन- प्रल्हाद कांबळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.