आता फेरीवाला धोरण राबविल्यावरच लातुरात येईन, मंत्री देशमुख यांची सूचना

Amit Deshmukh News, Latur Minicipal Corporation
Amit Deshmukh News, Latur Minicipal Corporation

लातूर : महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. त्यामुळे पुन्हा मुंबईला जावे लागणार आहे; पण तिथून परत लातूरला येण्याआधी फेरीवाला धोरण अमलात आले पाहिजे, अशा सूचना पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिल्या. महापालिकेने आठव्या दिवशी हे धोरण राबविले तर मी नवव्या दिवशी लतुरात येईन. पंधरा दिवसांत राबविले तर सोळाव्या दिवशी येईन. पालिकेला विलंबच होत राहिला तर ‘मी लातूरला लवकर का आलो नाही’, याचे उत्तर लातूरकरांना आपोआप समजेल, असेही त्यांनी यावेळी आवर्जून नमूद केले.


गंजगोलाई भागातील शिवभोजन थाळी केंद्राचे उद्‍घाटन देशमुख यांच्या हस्ते बुधवारी (ता. १९) झाले. यावेळी त्यांनी विविध विकासकामांतून लातूरला ‘मॉडेल सिटी’ म्हणून विकसित करू, असे आश्वासन दिले. महापौर विक्रांत गोजमगुंडे, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, माजी आमदार त्र्यंबक भिसे, ॲड. व्यंकट बेंद्रे, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मोईज शेख, नगरसेवक अशोक गोविंदपूरकर आदी उपस्थित होते.

श्री. देशमुख म्हणाले, की फेरीवाला धोरण लवकर अमलात आणले जाईल, असा शब्द मला महापौरांनी दिला आहे. ते धोरण तातडीने प्रत्यक्षात उतरेल, अशी अपेक्षा आहे. व्यावसायिकांना कायद्यनुसार जागा, वेळा, नियम ठरवून दिले तर त्यांना व्यवसाय करता येईल. याचा अनेकांना उपयोग होईल. अनेकांना होणारा त्रास कमी होईल. गंजगोलाईच्या टेरेसवर ओपन कॅफे करता येईल का, रहदारीवर उपाय म्हणून स्काय वॉक उभारता येईल का? याचाही विचार पालिकेने करावा. अशा वेगवेगळ्या आणि नावीन्यपूर्ण कामांतूनच लातूरकरांच्या स्वप्नातील लातूर प्रत्यक्षात आणता येईल.

धावणार इलेक्ट्रिक बस
लातुरात सुरवातीला दोन सिटी बस होत्या. आता सिटी बसची संख्या वीस झाली आहे; पण शहरात एकही बसस्टॉप नाहीत. चांगले-देखणे बसस्टॉप असायला हवेत. तसे ते महापालिकेने जागोजागी उभे करावेत. या बसस्टॉपमध्ये वाय-फाय, मोबाईल चार्जिंग, स्वच्छतागृह, पिण्याचे थंड पाणी अशा सुविधा असायला हव्यात. याबरोबरच आम्ही लातूरमध्ये प्रायोगिक तत्त्वावर इलेक्ट्रिक बस सुरू करणार आहोत. अशी बसही लवकरच लातुरात धावताना दिसेल. गाव भागात पालिकेची एक-दीड एकर जागा आहे. त्यांनी ती वैद्यकीय शिक्षण खात्याला दिली तर तिथे रुग्णालय उभे केले जाईल. त्यादृष्टीने पावले टाकली जात आहेत. अल्पसंख्याक मुलींच्या वसतिगृहाचे उद्‍घाटन लवकरच तर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्‍घाटन मे महिन्यात करण्यात येईल.


पुन्हा पाण्यावर बोलायची वेळ येऊ नये
उजनीचे पाणी लातूरला कसे आणता येईल, याचे काम सरकार पातळीवर सुरू झाले आहे. पाणी लतूरला आल्यानंतर ते लातूरकरांच्या घरापर्यंत कसे पोचेल, हा मुद्दाही तितकाच महत्त्वाचा आहे. पाण्याची वितरण व्यवस्था सक्षम करणे, हे पालिकेचे काम आहे. पाणी असूनही सध्या अनेक घरांपर्यंत ते पोचत नाही. काही ठिकाणी आले तर खूपच येते. मग पाणी वाया जाते. हा असमतोल बदलला गेला पाहिजे. तांत्रिक सल्लगार नेमून पाण्याच्या वितरणाची समस्या पालिकेने सोडवावी. महापौरांकडून, पालिकेकडून लातूरकरांच्या आणि माझ्याही खूप अपेक्षा आहे. पुन्हा पाण्यावर भाषणे करायची वेळ येऊ नये, अशी अपेक्षाही देशमुख यांनी व्यक्त केली. शिवभोजन थाळी केंद्राचे चालक शेख हकीम अमीर हमजा यांनी प्रास्ताविक केले. आसिफ बागवान यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com