लातूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने जाहीर केलेल्या संचारबंदीच्या काळातही नागरिक घराबाहेर पडत आहेत. प्रशासनाकडून कडक उपाययोजना केल्या जात आहेत. प्रसंगी लष्कराला पाचारण करण्यात येणार असून त्यासाठी नगरच्या दलाची तुकडी तयार ठेवली आहे. तूर्त तरी जिल्ह्यात लष्कराची गरज नाही. लोकांनी स्थानिक पोलिसांना साह्य करावे व सामाजिक (सोशल) पोलिसिंगसाठीही पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी बुधवारी (ता. एक) पत्रकार परिषदेत केले.
जिल्हाधिकारी श्रीकांत म्हणाले, की जिल्ह्यात कोरोनाला पाऊल ठेवू न देण्यासाठी विविध उपाययोजना प्रशासन करीत आहे. यापुढील काळात गरजेनुसार आणखी उपाययोजना केल्या जाणार आहेत. प्रशासनाला कडक भूमिका घ्यावी लागत आहे. निष्काळजीपणा अजिबात चालणार नाही. यामुळेच कोरोनाला रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. कारवाईमुळे लोक प्रशासनाला खलनायक समजत असले, तरी उपाययोजनांशिवाय पर्यायही नाही. कितीही कठोर निर्णय घ्यायचे ते घेतले जातील. हा काळ कारवाईचा नसून समजून सांगण्याचा आहे. लोकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून घराबाहेर पडू नये. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे उपस्थित होते.
प्रयोगशाळेसाठी यंत्रसामग्रीची प्रतीक्षा
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे रूपांतर कोरोना हॉस्पिटलमध्ये करण्यात येत आहे. हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र प्रवेशद्वारावर अन्य कामे पूर्ण होत आहेत. रुग्णालयात कोरोना संसर्गाची तपासणी करण्यासाठी प्रयोगशाळा उभारण्यात येत असून त्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे. आता केवळ यंत्रसामग्रीची प्रतीक्षा आहे. तीन दिवसांत यंत्रसामग्री आल्यास प्रयोगशाळा लवकरच सुरू होणार आहे, असेही जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सांगितले.
अन्न नको, धान्य द्या
कोरोनामुळे केलेल्या संचारबंदीमध्ये अनेक दानशूर व्यक्ती गरजूंना अन्नाच्या पाकिटांचे वाटप करीत आहेत. यापुढे पाकिटाचे वाटप करू नये. दानशूरांनी गरजूंसाठी धान्याचे किट द्यावे. त्याचे निकष जिल्हा प्रशासनाने निश्चित केले असून परस्पर कोणीही मदतीचे वाटप करू नये. प्रशासनाच्या माध्यमातूनच त्याचे वाटप करावे. लातूर अर्बन बॅंकेने दीडशे, तर आमदार अभिमन्यू पवार यांनी दोनशे किट दिल्याचेही श्रीकांत यांनी सांगितले. बाहेरच्या जिल्ह्यातील तीन हजार लोक जिल्ह्यात अडकले असून त्यांची सर्व व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
मोफत धान्यासाठी याद्या
कोरोनामुळे तीन महिने मोफत धान्य देण्याचा निर्णय सरकारने घेतला असून त्यासाठी कोणताही फॉर्म भरण्याची गरज नाही. सोशल मीडियावर व्हायरल झालेला फॉर्म फेक आहे. त्यावरून लोकांची फसवणूक करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सध्या रेशनकार्डावर नियमित धान्य मिळत असलेले, दुसऱ्या जिल्ह्यातील रेशनकार्ड असलेले, रेशनकार्डासाठी अर्ज ऑनलाइन करायचे राहिलेले; तसेच दुसऱ्या जिल्ह्यातील रेशनकार्ड नसलेले व जिल्ह्यात अडकून पडलेल्यांसाठी आधार व अन्य कागदपत्रांआधारे मोफत धान्य पुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी तलाठी कर्मचाऱ्यांना स्वस्त धान्य दुकानदारांच्या साह्याने याद्या तयार करण्यास सांगण्यात आल्याचे जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सांगितले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.