धर्माधर्मांत संवाद घडावाः फादर फ्रान्सिस दिब्रिटो

फादर फ्रांसिस दिब्रिटो
फादर फ्रांसिस दिब्रिटो

लातूर : धर्माधर्मांत संवाद घडवून आणण्याचे मोठे आव्हान साहित्यिकांसमोर उभे आहे. आपल्या लेखनातून साहित्यिकांनी हा संवाद घडवून आणायला हवा. आजच्या धार्मिक द्वेषाच्या स्थितीत साहित्यिकांचे हे प्रथम कर्तव्य आहे, अशा शब्दांत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नवनियुक्त अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी सद्यःस्थितीवर भाष्य केले. धर्मधुरिणांनी एकत्र यावे. धर्माचा गैरवापर होणार नाही, याकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. 


एकीकडे लेखन, तर दुसरीकडे सामाजिक कार्यात स्वत:ला झोकून देणारे दिब्रिटो यांची उस्मानाबाद येथे होणाऱ्या आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. यानिमित्ताने "सकाळ'ने त्यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले, धर्म मुळात फार चांगला आहे. सकारात्मक शक्ती देणारा आहे. धर्मातून प्रेरणाही मिळते. मला माझा धर्म सामाजिक कामाची प्रेरणा देतो.

पण अनेकांनी स्वार्थासाठी, राजकारणासाठी धर्माचा वापर केला. इथे धर्माची फार मोठी हानी झाली. इतर देशांत तर फारच मोठी हानी झालेली आपण पाहिली आहे. त्यामुळे एकमेकांत मैत्रीचे, सुसंवादाचे, एकतेचे वातावरण आपण वाढवायला हवे. त्यासाठी एका हातात धर्मग्रंथ आणि दुसऱ्या हातात भारताचे संविधान असायला हवे. 
संमेलनाध्यक्ष पदाच्या निवडीबाबत दिब्रिटो म्हणाले, पूर्वी निवडणुकीच्या माध्यमातून संमेलनाध्यक्ष निवडले जात होते. निवडणूक लोकशाहीत अपरिहार्यच आहे. पण तिचे स्वरूप निकोप राहिले नाही. साहित्याच्या क्षेत्रात तर ती असूच नये, असे माझे मत आहे.

मतांसाठी साहित्यिकाला हातात झोळी घेऊन फिरावे लागणे, हे चुकीचेच होते. ती पद्धत बंद झाली, हे अभिनंदनीय आहे. निवडणूक पद्धतीमुळे शिवाजी सावंत, दया पवार यांच्यासारख्या प्रतिभावंतांना आपण गमावून बसलो. ही साहित्य क्षेत्राचीच मोठी हानी होती. अनेक दिग्गजांना या प्रक्रियेमुळे अध्यक्ष होता आले नाही, याबाबत मनात खंत आहे. 

संमेलन साधेपणाने व्हावे 
आगामी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये होत आहे. तेथे दुष्काळाची स्थिती आहे, याची जाणीव मला आहे. माझे प्रत्येक समारंभ साधेपणानेच होतात. हे संमेलनसुद्धा साधेपणानेच होईल, याची जाणीव आयोजकांना आणि साहित्य महामंडळाला आहे, असे सांगून दिब्रिटो म्हणाले, साहित्य संमेलनाचा सोहळा हा तीन दिवसांपुरता असतो, असे अनेकांना वाटते. पण तीन दिवसांचा ठेवायचा की अखंडित चालू ठेवायचा, हे आपल्या प्रत्येकाच्या हातात आहे. इथे आपला सहभाग, आपली धडपड महत्त्वाची ठरते. 
 
हा मोठा सन्मान 
कुठलीही साहित्य परंपरा माझ्याकडे नाही. मी माझ्या परीने आजवर साहित्याची सेवा करीत आलो. या कार्याची दखल घेऊन साहित्य महामंडळाने मला साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद सन्मानाने दिले आहे. याबाबत मी अत्यंत समाधानी आहे. साहित्य संमेलनाला फार मोठी परंपरा लाभलेली आहे. अनेक दिग्गजांनी, विचारवंतांनी संमेलनाध्यक्षपद भूषविले आहे. या पदासाठी माझी निवड झाल्याने माझा मोठा सन्मान झाल्याची भावना माझ्या मनात आहे, अशा भावना फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी व्यक्त केल्या. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com