जालना : पडं रं पाण्या; नजरा आकाशाकडे...

रामनगर: पावसाअभावी पेरणी खोळंबली, शेतकरी चिंताग्रस्त
jalna marathwada farmer waiting for rain
jalna marathwada farmer waiting for rainsakal

रामनगर : यावर्षी जालना तालुक्यातील रामनगरसह परिसरात अद्याप एकही दमदार पाऊस झालेला नाही. दरम्यान जोरदार पाऊसाअभावी कपाशी लागवडीसह खरीप पिकांच्या पेरणीची कामे खोळंबली आहेत. जून महिना अर्धा संपला तरी अद्याप पावसाचा थांगपत्ता नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. परिणामी सगळ्यांच्या नजरा आकाशाकडे लागलेल्या आहेत.

यावर्षी तरी मुबलक पाऊस होईल या आशेवर शेतकऱ्यांनी शेतजमिनी तयार केल्या आहेत. मात्र पावसाचे रोहिणी नक्षत्र पाठोपाठ मृग नक्षत्रही पूर्णपणे कोरडे जात आहे. परिणामी यंदा खरीप हंगामात दमदार पावसाअभावी जमिनी पडीक राहतात की काय अशी चिंता परिसरातील शेतकरी व्यक्त करीत आहेत. दरवर्षी मृग नक्षत्रापूर्वी मान्सूनपूर्व पाऊस पडत असतो. यंदा मात्र बेमोसमी पावसानेही रामनगर परिसराकडे पाठ फिरवली आहे.

दररोज सकाळी सोसाट्याचा गार वारा, दुपारी कडक ऊन, सायंकाळी पावसाचे दाटून आलेले काळे ढग आणि रात्री आकाशात टिपूर चांदणे पडत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या ऊन सावलीच्या खेळाने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. मागील वर्षी अति पावसामुळे शेतकऱ्यांचे खरीप व रब्बी दोन्ही हंगाम वाया गेले होते. परतीच्या पावसाने झोडपल्यानंतर हाती आलेल्या थोड्याशा उत्पन्नावर शेतकऱ्यांनी कसेबसे वर्षे कडेला लावले.

यावर्षी तरी जास्त पाऊस होईल या आशेवर परिसरातील शेतकऱ्यांनी नव्या उमेदीने मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच खरीप पेरणीपूर्व मशागतीची कामे आटोपली आहेत. मात्र आता जून महिना अर्धा संपत आला तरी परिसरात अजूनही जोरदार पाऊस झालेला नाही. पावसाचा एकही थेंब नसल्याने शेतकरी आतुरतेने पावसासाठी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत. दरवर्षी रामनगरसह परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांचा जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात कपाशी लागवडीसह खरिपाची पेरणी करण्याचा अधिक कल असतो.

यामध्ये वेळेवर पाऊस झाल्यास सात जूनच्या आसपास कपाशी, मूग, उडीद, तूर, सोयाबीन आदी पिकांच्या पेरण्या पूर्ण झालेल्या असतात. जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणी झाल्यास शेतमालाचा उतारा चांगला येतो असा अनेक ज्येष्ठ शेतकऱ्यांचा अनुभव आहे. मात्र या वर्षी सात जूनच्या पेरणीचा मुहूर्त हुकल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली असल्याचे दिसून येत आहे.

यंदा वेळेवर पाऊस होईल अशी शेतकऱ्यांना आशा होती. परंतु मृग नक्षत्र कोरडे जात असल्याने खरीप पेरणी लांबली आहे. परिणामी पावसाअभावी शेतकरी हवालदिल झाले आहेत.

- दादासाहेब भुतेकर माजी सरपंच, हिवरा रोषणगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com