Jalna Water Crisis : साडेतीनशे गावांवर दुष्काळाची छाया; जालना जिल्ह्यात ६२ टॅंकर सुरू, सार्वजनिक स्रोतांमधून उपशाला प्रतिबंध

जालना जिल्ह्यात सात मध्यम व ५७ लघु प्रकल्पात ११.८९ टक्के उपयुक्त पाणीसाठा
jalna water crisis 350 village water scarcity 62 water tanker to supply water
jalna water crisis 350 village water scarcity 62 water tanker to supply waterSakal

जालना : अल्प पाऊस झाल्याने जिल्ह्याला यंदा दुष्काळाच्या दुष्टचक्राने घेरले आहे. खरीप हंगाम तर वाया गेलाच, आता पाणी टंचाईमुळे दुष्काळ दारात असून सध्या २४ गावे आणि १४ वाड्यांना ६२ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. दरम्यान, काही तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर झालेली आहे.

त्यामुळे गावातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत घोषित करुन पाचशे मीटरच्या आत पिण्याच्या पाण्याशिवाय नवीन स्त्रोत निर्माण करणे आणि उपसा करण्यास प्रतिबंध करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी दिले आहेत.

जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्पांनी यंदा नोव्हेंबर महिन्यातच तळ गाठला आहे. जिल्ह्यात सात मध्यम व ५७ लघु प्रकल्पात ११.८९ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.

भोकरदन शहरासह खेड्यांना पाणी पुरवठा करणारा जुई मध्यम आणि अंबड तालुक्यातील गल्हाटी मध्यम प्रकल्प जोत्याखाली गेला आहे. शिवाय ४० लघु प्रकल्पांची पातळी जोत्याखाली गेली आहे.

भोकरदन तालुक्यातील धामना मध्यम प्रकल्पात २२.८०, जाफराबादच्या जिवरेखा मध्यम प्रकल्पात १५.५०, बदनापूर तालुक्यातील अप्पर दुधना प्रकल्पात १९.०१, जालना तालुक्यातील कल्याण मध्यम प्रकल्पात ३४.९४ आणि कल्याण गिरजा प्रकल्पात ३८.१६ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.

३७ टँकर सुरू

२४ गावे आणि १४ वाड्यांवरील ६६ हजार ७९ ग्रामस्थांना आज घडीला ३७ टँकरव्दारे पाणी पुरवठा केला जात आहेत. यामध्ये जालना तालुक्यात पाच गावे, तीन वाड्या, बदनापूर तालुक्यातील नऊ गावे, आठ वाड्या, भोकरदन तालुक्यातील नऊ गावे, एक वाडी, मंठा तालुक्यातील एक वाडीला टँकव्दारे पाणी पुरवठा होत आहे.

जुई मध्यम प्रकल्प कोरडा

भोकरदन शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जुई मध्यम प्रकल्प कोरडा पडला आहे. त्यामुळे शहराचा पाणी प्रश्‍न गंभीर झाला असून भोकरदन शहरातील ३२ हजार ६८० नागरिकांना २५ टँकव्दारे पाणी पुरठा होत आहे. येत्या काळात शहरातील टँकरच्या संख्येत वाढ होण्याची चिन्हे आहेत.

८५ विहिरींचे अधिग्रहण

पावसाने हुलकावणी दिल्याने पाणी टंचाईचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून ८५ विहिरींचे अधीग्रहण करण्यात आले आहे. यामध्ये टॅंकरसाठी ४२ तर टँकर व्यकिरिक्त ४३ विहिरींचे अधीग्रहण करण्यात आले आहे.

मार्च ते जूनदरम्यान वाढणार दाहकता

मार्च ते जूनदरम्यान जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वाढणार आहे. या काळात पुन्हा १५३ गावांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. यात अंबड तालुक्यातील २०, घनसावंगी २९, जाफराबाद २०, जालना १८, परतूर १२, बदनापूर सहा, भोकरदन १७, मंठा २१ तालुक्यातील येथील गावांना पाणी टंचाईचा प्रश्‍न भीषण होणार आहे.

डिसेंबरपर्यंत जाणवणार १३८ गावांत पाणीटंचाई

ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान जिल्ह्यातील १३४ गावांना पाणी टंचाईचा फटका बसण्याची शक्यता आहे. अंबड तालुक्यातील ३७, घनसावंगी २७, जाफराबाद दोन, जालना २३, परतूर १६, बदनापूर,११ भोकरदन २२ गावांचा समावेश आहे.

जिल्ह्यात यंदा पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील भूजल पाणी पातळी, प्रकल्पातील उपलब्ध पाणी याच्या अहवालानुसार जिल्ह्यातील साडेतीनशे गावांध्ये जून २०२४ पर्यंत पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या गावांच्या सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत घोषित करुन पाचशे मीटरच्या आत पिण्याच्या पाण्याशिवाय नवीन स्त्रोत निर्माण करणे आणि उपसा करण्यास प्रतिबंध करण्यात आल्याचे आदेश दिले आहेत. शिवाय बुधवारी टंचाई निवारण बैठकीत आढावा घेऊन योग्य त्या उपायोजनांसंदर्भात आदेश दिले जातील.

— डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ, जिल्हाधिकारी, जालना.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com