लातूर : सत्ता बदलामुळे प्रभाग रचनेकडे लक्ष

भाजपची चारसदस्यीय रचना महाविकास आघाडीने केली तीन सदस्यीय
Latur municipal corporation election
Latur municipal corporation electionesakal

लातूर : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्रभाग रचनावर आक्षेप घेवून सुनावणीचा कार्यक्रमही सर्वत्र सुरू आहे. भारतीय जनता पक्षाची सत्ता असताना चार सदस्यीय प्रभागरचना करण्यात आली होती. त्याचा फायदाही अनेक ठिकाणी या पक्षाला झाला. पण नंतर सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी शासनाने ही प्रभाग रचना तीन सदस्यीय केली. त्यानुसार त्यावर आक्षेप घेऊन सुनावण्या सुरू आहेत. पण आता राज्यात सत्ता बदल झाला आहे. पुन्हा शिवसेना व भाजप सत्तेवर आला आहे. त्यामुळे पुन्हा प्रभाग रचना बदलाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे सुरू झाले आहे. प्रभाग रचना त्यात एक महत्त्वाचा भाग आहे. भाजपचे देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात महापालिकेची चार सदस्यीय प्रभाग रचना करण्यात आली होती. त्याचा भाजप तसेच त्यांच्यासोबत असलेल्या शिवसेनेला अनेक ठिकाणी फायदा झाला होता. पण त्यांची सत्ता गेल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस असे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले. या सरकारने चार सदस्यीय प्रभाग रचना बदलून टाकली. पहिल्यांदा एक सदस्यीय प्रभाग रचनेचे आदेश देण्यात आले.

त्यानंतर ते रद्द करून तीन सदस्यीय प्रभाग रचना करण्याचे आदेश देण्यात आले. लातूर महापालिकेने देखील या आदेशानुसार प्रभाग रचना करुन शासनाला सादर केली होती. त्यानंतर ती राज्य निवडणूक आयोगालाही सादर करण्यात आली. यावर आक्षेप व हरकतीही मागवण्यात आल्या होत्या. यात ३४ आक्षेप आले होते. महापालिकेत शनिवारी या हरकतीवर सुनावण्याही घेण्यात आल्या.

या करीता राज्य शासनाचे प्रतिनिधी म्हणून पणन मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक दीपक तावरे, आयुक्त अमन मित्तल, विभागीय आयुक्ताचे प्रतिनिधी वामन कदम, राज्य निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी यावेळी उपस्थितीत होते. या सुनावण्यानंतर याचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाला सादर केला जाणार आहे. त्यानंतर अंतिम प्रभाग रचना जाहिर होणार आहे. दरम्यान राज्यात सत्तांतर झाले आहे. त्यामुळे पुन्हा प्रभाग रचनेत बदल होईल, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे.

इच्छुकांचे `वेट ॲण्ड वॉच`

राज्यात आता शिवसेनेला `जय महाराष्ट्र` करून आलेले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर भाजपचे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे प्रभागरचनेवर तीव्र आक्षेप घेतलेल्या भाजपच्या कार्यकर्त्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. सत्ता बदलल्यामुळे प्रभाग रचनेत पुन्हा बदल होईल अशी आशा कार्यकर्त्यांना आहे. त्यामुळे सर्वच इच्छुक उमेदवार देखील आता `वेट ॲण्ड वॉच`च्या भूमिकेत असल्याचे दिसून येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com