Beed News : विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे होईना कमी

हिवाळ्यात शाळेच्या वेळातही व्हावा बदल : शारीरिक, मानसिकतेचा विचार कधी करणार?
beed
beed nanded

बीड : शाळेत जाताना भरगच्च वह्या, पुस्तकाचे ओझे घेऊन शाळेत जावे लागणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिकतेवर परिणाम होत असल्याचे निरीक्षण करण्यात आले आहे. हे ओझे कमी करण्याबाबत अनेकदा खल झाला असला तरी, अद्यापही शाळांनी याबाबत उपाययोजना केल्या नसल्याने चिमुकल्या जिवांना मात्र दररोजच हा भार सोसावा लागत आहे. याबाबत राज्यपालांनी केलेल्या सूचनेचे पालन शाळा व्यवस्थापनाने करून दप्तरांचे ओझे कमी करण्याबाबत पाऊल उचलणे गरजेचे आहे. तर, हिवाळ्यात शाळांच्या वेळातही बदल करणे आवश्यक आहे.

शाळेत जाताना सर्व विषयांचे पाठ्यपुस्तक, त्यासाठी लागणाऱ्या वह्या, शिक्षकांना दाखवण्यासाठी पूर्ण केलेल्या गृहपाठाच्या वह्या, जेवणाचा डबा, पाणी बॉटल यासारख्या शैक्षणिक साहित्यांनी विद्यार्थ्यांचे दफ्तर भरगच्च भरलेले असते. हे सर्व ओझे घेऊन अनेक विद्यार्थी शाळेच्या वाटेने चालताना दिसतात. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना हे सगळे ओझे पाठीवर घेऊन पायपीट करावी लागते. लहान वयातच दररोज पाठीवर ओझे घेऊन चालावे लागत असल्याने शारीरिक परिणाम भोगावे लागतात.

दप्तराच्या ओझ्याचा बालमनावरही परिणाम होत असल्याचे निरीक्षण करण्यात आले आहे. यामुळे पाचवी ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत शिक्षण विभागाने अनेकवेळा उपाययोजना करण्याचे सांगितले; परंतु अद्यापही याबाबत निर्णय झाला नसून शाळा व्यवस्थापनानेही काहीच पाऊल उचलले नसल्याचे दिसून येत आहे.

थंडीत कुडकुडत शाळेत दाखल

बदलत्या जीवनशैलीमुळे सर्वांच्या झोपेच्या वेळा बदलल्या आहेत; परंतु शाळेत जाण्यासाठी मुलांना लवकर उठावेच लागत असल्याने मुलांची झोप पूर्ण होत नाही. मुलांना चांगली झोप मिळावी, या दृष्टीने सकाळी लवकर असलेल्या शाळेच्या वेळेत बदल करणे आवश्यक आहे. सध्या हिवाळ्याच्या दिवसातही शाळेने वेळेत बदल न केल्याने थंडीत कुडकुडत शाळेत जावे लागते.

उपाययोजना करणे अत्यावश्यक

पंधरा दिवसांपूर्वी राजभवनात राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी राज्यपालांनी ई-वर्गाला चालना देऊन विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तरांचे ओझे कमी करत पुस्तकाविना शाळा या संकल्पनेचा विचार व्हायला हवा, असे सांगितले. राज्याच्या शिक्षण विभागानेही अनेकदा दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत घोषणा केल्या; परंतु त्याची अंमलबजावणी मात्र शाळा प्रशासनाने केली नसल्याचे दिसून येत आहे. बालकांचा शारीरिक, मानसिक विचार करून शाळा प्रशासनाने दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत उपाययोजना करणे आवश्यक आहे.

मुलांच्या वयाचा विचार करता त्यांच्या पाठीवरील दप्तरांचे ओझे त्यांच्या जिवापेक्षा जास्त आहे. चिमुकल्या मुलांच्या मानसिकतेचा विचार करून शिक्षण विभागाने याबाबत तत्काळ उपाययोजना करायला हव्यात.

- राजेभाऊ अर्जुन, पालक.

यावर्षीपासून शिक्षण विभागाने ‘एकात्मिक पाठ्यपुस्तक योजना’ राबवली आहे. यात संपूर्ण विषयाचा अभ्यासक्रम एकाच पुस्तकात दिला असून त्यातही तीन भाग केले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे खूप कमी होणार आहे.

- रवींद्र महामुनी, गटशिक्षणाधिकारी, माजलगाव.

शाळेच्या वेळा लवकर व प्रमाणापेक्षा जास्त असल्याने विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर आणि स्वास्थ्यावर विपरीत परिणाम करणाऱ्या आहेत. राज्यपाल रमेश बैस यांच्या सूचनेनुसार दप्तरांचे ओझे कमी करण्याबाबत आणि शाळेच्या वेळेत बदल करण्याबाबत तत्काळ अंमलबजावणी करावी. जेणेकरून शिक्षण हे विद्यार्थ्यांसाठी आनंददायी व्हावे, यासाठी शिक्षण विभागाने प्रयत्न केले पाहिजेत.

— मनोज जाधव, आरटीई कार्यकर्ते, बीड.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com