सनईच्या सुरांना ‘कोरोना’ची नजर

file photo
file photo

परभणी : कोरोना... कोरोना... आणि फक्त कोरोना...! सध्या संपूर्ण जगभर चर्चा असणारा पण तितकाच भयानक हा विषय. या कोरोनाने जगाची अर्थव्यवस्थाच डबघाईला नेली आहे. कोरोना भारतात सुरू झाला तो काळ म्हणजे मार्च महिन्याचा. या महिन्यापासूनच भारतात लग्नसराईला सुरवात होते. परंतु, कोरोनाच्या या सुनामीमध्ये संपूर्ण लग्नसराईच वाहून गेली. एकट्या परभणी जिल्ह्याचा विचार केला तर मंगल कार्यालयांसह त्याच्यावर चालणारे इतर छोट्या उद्योगांचे तब्बल १०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
महाराष्ट्रात उन्हाळ्यात शेतीची जवळपास सर्वच कामे आटोपली जातात. या काळात राज्यात सर्वाधिक संख्येने असणारा शेतकरी निवांत असतो. त्याच बरोबर शाळांनाही सुट्या असतात. त्यामुळे या काळात लग्न समारंभाचे आयोजन केले जाते. मार्च ते जून या कालावधीत सर्वाधिक लग्न तारखादेखील असतात. परंतु, यंदा या तारखा केवळ दिनदर्शिकेवरच राहिल्या. कारण जगभर पसरलेल्या कोरोना विषाणूंमुळे यंदाचे विवाह समारंभ रद्द करण्याचे आदेश सरकारने दिले. सर्व मंगल कार्यालयांना नोटिसा देऊन कोणत्याही ऑर्डर न घेण्यास सांगण्यात आले. बुकिंग रद्द करण्याचेदेखील फर्मान सोडण्यात आले आणि तिथूनच सुरू झाली मंगल कार्यालये व त्यावर आधारित छोट्या उद्योगांची कर्मकहाणी. सलग तीन महिणे मंगल कार्यालये बंद राहिल्याने या उद्योगाची संपूर्ण साखळीच तुटली. परभणी जिल्ह्यात आज घडीला ४० ते ५० छोटे - मोठे मंगल कार्यालये आहेत. हे सर्व बंद आहेत. या मंगल कार्यालयचालकांसह या उद्योगावर आधारित इतर छोट्या उद्योगांचे तब्बल १०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

कोरोनामुळे अर्थिक गणितेच बिघडली
कोरोना संसर्ग झाल्यानंतर मंगल कार्यालयचालकांची आर्थिक गणितेच बिघडली आहेत. केंद्र सरकारने तीन महिने ईएमआय न भरण्याची सूट दिली असली तरी ती कितपत या व्यावसायिकांच्या फायद्याची ठरणार आहे, हादेखील प्रश्नच आहे. कारण तीन महिन्यांनंतर पुन्हा या व्यावसायिकांना बॅंकेच्या कर्जाचे हप्ते भरावेच लागणार आहेत. सिजन डोळ्यासमोर धरून हे व्यावसायिक यात पैसे गुंतवित असतात. परंतु, ऐन सिजन सुरू होण्याआधीच कोरोनाचा हल्ला झाल्याने आता या व्यावासयिकांची आर्थिक गणितेच बिघडली आहेत.

वीज कंपनीचा अधिभारही डोक्यावर
एकीकडे मंगल कार्यालयच बंद असल्याने या ठिकाणी वीज वापर होत नाही. परंतु, वीज कंपनीकडून पहिल्यासारखाच वीज अधिभार लावून वीज बिले दिली जात आहेत. ज्या ठिकाणी वीज वापरच झाला नाही तेथे अव्वाच्या सव्वा वीजबिले भरावी तरी कशी, हा प्रश्नही या व्यावसायिकांसमोर उभा आहे.

प्रशासनाने परवानगी द्यावी
जिल्ह्यातील मंगल कार्यालये सुरू करून समारंभ साजरे करण्यास प्रशासनाने परवानगी द्यावी. कमी लोकांच्या संख्येत व प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन आम्ही निश्चित करू. मंगल कार्यालय सुरू करण्याची प्रशासनाने परवाणी द्यावी, जेणेकरून या उद्योगातील उद्योजकांना बसणाऱ्या मोठ्या अर्थिक फटक्यातून ते थोडे तरी सावरतील.
- अभिजित सराफ, मंगल कार्यालय मालक.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com