औरंगाबाद - वाळूज एमआयडीसीतील कंपन्यांच्या तोडफोड प्रकरणाची चौकशी सीआयडीमार्फत करावी, अशी मागणी मराठा मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केली. मराठा समाजाला यात विनाकारण गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही तोडफोड उद्योगांची नसून, संपूर्ण शहराचीच असल्याचे सांगत त्यांनी या घटनेचा निषेध केला.
गुरुवारच्या "महाराष्ट्र बंद'दरम्यान वाळूज परिसरात उद्योगांवर दगडफेक करीत आत घुसून तोडफोड झाली. याचा समन्वयकांनी निषेध केला. समन्वयक म्हणाले, 'वाळूज प्रकरणात समाजकंटक घुसले होते. छत्रपतींचे मावळे असे काही करणार नाहीत. या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी सीआयडीतर्फे सखोल चौकशी करावी. जो प्रकार नवी मुंबई, चाकण येथे झाला त्यापेक्षा भयंकर घटना वाळूज औद्योगिक वसाहतीत घडली. उद्योगांमध्ये सीसीटीव्ही आहेत. पोलिसांनी ते तपासून हिंसाचार करणाऱ्यांना ताब्यात घ्यावे. ते आंदोलक होते का, हे त्यांना पकडल्यानंतरच स्पष्ट होईल.''
|