Marathwada Muktisangram 2023 : काकासाहेब देशमुख : एक झंझावात

नागापूर हे करंजखेड परिसरातील एक गाव. गावात शहानूर नावाचा एक निजाम पोलिस कॉन्स्टेबल राहत होता
काकासाहेब देशमुख
काकासाहेब देशमुख sakal

नागापूर हे करंजखेड परिसरातील एक गाव. गावात शहानूर नावाचा एक निजाम पोलिस कॉन्स्टेबल राहत होता. या शहानूरने परिसरात दहशत निर्माण केली होती. शहानूरच्या नावावर अनेक अत्याचाराच्या घटना नोंद होत्या. काही खून आणि स्त्रियांची अवहेलना त्याने केली होती. एके दिवशी त्याचा बंदोबस्त करायचे काकासाहेबांनी ठरविले.

काकासाहेब देशमुख सशस्त्र क्रांतीचे समर्थक होते. केवळ मराठवाडा मुक्तिसंग्राम नव्हे, तर अनेक लढायांत ते सहभागी होते. काकासाहेबांनी पुंजाजी पाटीलसह काही माणसे सोबत घेतली. त्यांना कळले की शहानूर पूर्ण नदीच्या बांधाजवळ आहे. काकासाहेब तिकडे निघाले. त्यांना पाहताच क्षणी शहानूरच्या सोबत्याने काकासाहेबांवर बंदुकीचा नेम धरला.

काकासाहेब हात वर करून त्याच्या जवळ गेले. क्षणात काकासाहेबांनी त्याच्या जवळची बंदूक हिसकावून घेतली. हे शहानूरने पाहिल्यानंतर त्याने काकासाहेबांवर गोळी झाडली. मात्र, काकासाहेबांनी गोळी हुकवली. हुकवलेली गोळी शहानूरच्या सोबत्याला लागली. तो जागेवर मृत्युमुखी पडला. त्यामुळे शहानूर गडबडला आणि जंगलाच्या दिशेने पळून गेला. चवताळलेल्या काकासाहेबांनी शहानूरच्या नातलगांना घराबाहेर काढत एका ओळीत उभे केले. त्यांना काकासाहेब म्हणाले, मला शहानूर आणून द्या. तरच तुम्हाला जीवदान देईल. ही बातमी शहानूरला मिळताच तो काकासाहेबांना शरण आला.

काकासाहेबांनी त्याला काढण्या घालून करंजखेडला आणले. गावातील चौकीत आणून खांबाला बांधले. यावेळी दोन ते तीन हजार लोक जमा झाले होते. काकासाहेबांनी जमलेल्या जनसमुदायाला विचारले, या शहानूरचे काय करायचे, लोक ओरडले. त्याला गोळ्या घाला, काकासाहेबांनी आपल्या हातातील बंदुकीने तीन गोळ्या झाडल्या. क्षणार्धात शहानूर जमिनीवर कोसळला. ‘भारत माता की जय’ अशा घोषणा जनसमुदायातून उमटल्या.

यामध्ये अनेक मुस्लिमही उपस्थित होते. त्यांचाही शहानूरच्या वर्तनावर राग होता. या घटनेवरून एकच गोष्ट लक्षात येते की, काकासाहेबांची लढाई मुस्लिमांविरुद्ध नव्हती, तर ती अन्यायाविरुद्ध होती.

गौताळ्याच्या घनदाट जंगलात अंतूर किल्ला आहे. हा किल्ला निजाम राज्याच्या सीमेवर येतो. दुसऱ्या बाजूने खानदेशचा पट्टा लागतो. येथे रझाकार गुप्त बैठका घेत. किल्ल्यावर कोणी जात नव्हते. पण किल्ला या परिसराचे आकर्षण होते. त्यामुळे या किल्ल्याची निवड करून काकासाहेबांनी त्यावर तिरंगा फडकवला. अजून मराठवाडा स्वतंत्र व्हायचा होता. तरीही काकासाहेबांनी तिरंगाच फडकावला. यामुळे निजामी राजवटीला एक संदेश पोचला. निजामशाहीचा निषेध करण्याचा हा एक क्रांतिकारी प्रयत्न होता.

(अच्युत वि. भोसले यांच्या झुंजार क्रांतिवीर काकासाहेब या पुस्तकातील उतारा)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com