गटबाजीवर मात करून जिल्ह्यातील चित्र नाना बदलून टाकतील, पक्ष पुन्हा उभारी घेईल, अशी सामान्य कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. पण नव्या प्रदेशाध्यक्षांचा पहिलाच दौरा कार्यकर्त्यांच्या अपेक्षेवर ‘अश्रू’चे पाणी फेरून गेला
औरंगाबाद: प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोले यांनी पदभार घेतल्यानंतर काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आले आहे. गटबाजीवर मात करून जिल्ह्यातील चित्र नाना बदलून टाकतील, पक्ष पुन्हा उभारी घेईल, अशी सामान्य कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. पण नव्या प्रदेशाध्यक्षांचा पहिलाच दौरा कार्यकर्त्यांच्या अपेक्षेवर ‘अश्रू’चे पाणी फेरून गेला. काँग्रेस कार्यकर्त्यांना तब्बल पाच तास ताटकळत ठेवून नाना शहरभर फिरले. पक्षाशी संबंध नसलेल्यांकडून सत्कार घेतला. मेळाव्याचे आयोजक पक्षाचे जिल्ह्याचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे यांच्या डोळ्यात त्यांनी अश्रू आणले आणि याच मेळाव्यात आठ आमदार निवडून आणण्याचे स्वप्नही पाहिले गेले. प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्यानंतर मात्र पुन्हा चर्चा सुरू झाली पक्षातील गटबाजीचीच.
कधी काळी बालेकिल्ला असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील कॉंग्रेस पक्ष पार रसातळाला गेला आहे. अंतर्गत गटबाजी, हक्काचे मतदार पक्षापासून दूर गेल्यामुळे गेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील नऊपैकी आठ मतदारसंघात पक्षाला उमेदवार न मिळाल्याने मोठी नाचक्की झाली. नवे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पदभार घेतल्यापासून राज्यभर फिरून कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला आहे. सोमवारी (ता.१६) नाना पटोले औरंगाबाद दौऱ्यावर आले होते. त्यामुळे शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या कार्यक्रमातून नाना पटोले यांनी वेगळीच वाट निवडल्याने जिल्ह्यातील कार्यकर्त्यांसह पदाधिकारी संभ्रमात आहेत.
नुकत्यात राष्ट्रवादी काँग्रेमध्ये प्रवेश केलेल्या कलीम कुरेशी, काँग्रेसमध्ये सक्रिय नसलेल्या युसूफ मुकाती, एमआयएमसोबत असलेले अरुण बोर्डे यांचा सत्कार नाना पटोले यांनी स्वीकारला तर दुसरीकडे पक्षाच्याच कार्यकर्त्यांना त्यांनी ताटकळत ठेवले. ‘व्यर्थ ना हो बलिदान’ हा प्रदेश काँग्रेसचा कार्यक्रम असताना स्वातंत्र्यसैनिकांच्या सत्काराला ते तब्बल दोन तास उशिरा आले. नियोजन करणाऱ्यांना वारंवार स्वातंत्र्यसैनिकांची माफी मागावी लागली. कहर झाला तो काँग्रेसच्या मेळाव्यात. सागर लॉन्स येथील मेळाव्याची दुपारी तीनची वेळ होती पण नाना पोचले तब्बल पाच तास उशिराने! म्हणजेच रात्री साडेआठ वाजता. विशेष म्हणजे काँग्रेस मेळाव्यानंतर नियोजित असलेल्या ‘भीमशक्ती’च्या मेळाव्याला त्यांनी प्राधान्य दिले. त्यामुळे कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला. काही जणांनी थेट स्टेजवर जाऊन प्रदेशाध्यक्षांना इतर कार्यक्रम महत्त्वाचे वाटतात का? असा प्रश्न केला. त्यांची समजूत काढताना पदाधिकाऱ्यांच्या नाकीनऊ आले. विशेष म्हणजे, हा गोंधळ सुरू असताना शिवाजीराव मोघे यांनी आगामी निवडणुकीत जिल्ह्यात आठ आमदार निवडून येतील अशा विश्वास व्यक्त केला!
हुजरेगिरी करणारे कोण?
काँग्रेसचे माजी आमदार सुभाष झांबड यांचा लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला. त्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी मनमोकळे करताना पक्षाची जिल्ह्यातील काय अवस्था आहे याची कहाणी प्रदेशाध्यक्षांपुढे कथन केली. पक्षातील काही जण नेते आले की, त्यांना हारतुरे घालून हुजरेगिरी करतात. पण तुम्ही तळागाळात जाऊन काम करणाऱ्या, ज्यांना जनाधार आहे त्यांना बळ द्या, अशी मागणी श्री. झांबड यांनी केली. त्यानंतर हुजरेगिरी करणारे कोण? अशी चर्चा सुरू झाली आहे.
पैठण तालुकाध्यक्ष पदावरून खदखद
पैठण तालुकाध्यक्ष पदावरून जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये खदखद सुरू आहे. माजी मंत्री अनिल पटेल यांचा मुलगा निमेश पटेल यांची पैठण तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्याचे आदेश थेट प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले होते; पण त्यापूर्वीच तालुकाध्यक्षपदी डॉ. कल्याण काळे यांनी हसनोद्दीन कट्यारे यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे नाना पटोले हे श्री. काळे यांच्यावर नाराज असल्याची चर्चा आहे. यापुढे प्रदेश कमिटी सांगेल तेच होईल, तशी ताकीद त्यांनी व्यासपीठावरून दिली. काही कार्यकर्ते घोषणा देत होते. त्याचा उल्लेख करत पटोले यांनी ‘कल्याण काळे आगे बढो अशा घोषणा देऊ नका, आता तुम्हालाच पुढे जायचे आहे, असा चिमटाही काढला. मला उशीर झाल्याने काळेंच्या डोळ्यात अश्रू आले, असे व्यासपीठावरून सांगून कोणता संदेश दिला? अशीही चर्चा कार्यक्रमानंतर सुरू झाली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.