परभणीसह नांदेड, हिंगोलीत पाऊस; रब्बी पिके धोक्यात

ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने रब्बी हंगामातील पिके धोक्यात आली
ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने रब्बी हंगामातील पिके धोक्यात आली

परभणी : मागील काही दिवसांपासून मराठवाड्यात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने रब्बी हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. त्यातच अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत असल्याने हरभरा आणि तूर या पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, मंगळवारी (ता.३१) पहाटे पाचच्या सुमरास परभणीसह हिंगोली, नांदेड  जिल्ह्यात सुमारे दहा मिनिटे जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला.

मागील काही दिवसांपासून संपूर्ण मराठवाड्यात आभाळ भरून येत आहे. दिवसभर ऊन-सावल्यांचा खेळ सुरू आहे. शनिवार आणि रविवारी  सूर्यदर्शनदेखील झाले नाही. त्यातच थंडगार वारे सुटल्याने थंडीचा कडाकादेखील वाढला आहे. सलग ढगाळ वातावरण राहिल्याने पिकांवर त्याचा विपरीत परिणाम दिसून येत आहे. मागील आठवड्यातदेखील ढगाळ वातावरण काही दिवस राहिले होते. त्याचा फटका म्हणून हरभरा आणि ज्वारीवर पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. 

तुरीच्या शेंगा अळ्यांकडून फस्त
आताही सलग चार दिवसांपासून ढगाळ वातावरणाने पिकांवर अळ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. हरभरा पिकाची शेंडे आणि पाने तसेच तुरीच्या शेंगादेखील अळ्यांकडून फस्त केली जात आहेत. मोठ्या प्रमाणात पेरणी झालेल्या ज्वारीची पोंगे नष्ट केली जात आहेत. ढगाळ वातावरणाचा फटका गहू पिकालादेखील बसला आहे. मागील महिन्यात अनेक ठिकाणी गव्हाची पेरणी झाली आहे. पेरणी झालेला गहू वाढीच्या अवस्थेत असतानाच ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने वाढ खुंटली आहे.

परभणीत दहा मिनिटे पाऊस
 शहरात शनिवारी (ता.२८) रिमझिम, तर मंगळवारी (ता.३१) पहाटे पाच वाजता दहा मिनिटे जोरदार सरी कोसळल्या. सोमवारी (ता.३०) रात्रीपासून आभाळ भरुन आले होते. मंगळवारी पहाटे चार वाजल्यापासून रिमझिम पावसाला सुरवात झाली होती. पाच वाजता जोरदार पाऊस झाला. दहा मिनिटे जोरदार पाऊस झाल्याने शहरात रस्त्यावर पाणी साचले. परभणी, सेलू, सोनपेठ, पालम, पूर्णा या भागात पाऊस होता.

 


वातावरणाचा फटका आरोग्यावर 
पिकांसोबतच ढगाळ वातावरणाचा परिणाम मानवी आरोग्यावर झाला आहे. बदलेल्या वातावरणामुळे दम्याचा आजार असणाऱ्या रुग्णांना त्रास सुरू झाला आहे. तसेच संधीवात, अंगदुखी आदींचे रुग्ण वाढले आहेत. सर्दी, ताप, खोकला आदींच्या रुग्णात वाढ झाली आहे.

 आणखी चार दिवस ढगाळ वातावरण


ढगाळ  वातावरण आणखी चार दिवस कायम राहील, असा इशारा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्‍या ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागाने दिला आहे. उस्मानाबाद, परभणी, लातूर, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात ता.एक व दोन रोजी तुरळक हलक्या पावसाची शक्यता या विभागाने वर्तविली आहे. तसेच चार जानेवारीपर्यंत सर्व मराठवाड्यात ढगाळ वातावरण राहील, अशी माहिती विभागप्रमुख
डॉ. कैलास डाखोरे यांनी ‘सकाळ’ शी बोलताना दिली.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com