पाऊस आहे मात्र पाणी नाही, धरणे कोरडीच

पाऊस आहे मात्र पाणी नाही, धरणे कोरडीच

कन्नड (जि.औरंगाबाद) ः ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीपासून तालुक्‍यात दमदार पावसाने हजेरी लावली होती. सलग तीन दिवसांपासून होत असलेल्या रिमझिम पावसामुळे शेतकऱ्यांसह विद्यार्थी, नोकरदारवर्गाला रिमझिम पावसातच बाहेर पडावे लागत आहे. अधून-मधून होणाऱ्या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांना आंतरमशागतीच्या कामात अडथळा निर्माण झाला आहे.

पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले असले तरी सूर्यप्रकाशाअभावी पिकाची वाढ खुंटून मका व कपाशी पिकामध्ये मोठ्या प्रमाणात तणाची वाढ झाली आहे.
तालुक्‍यात जून व जुलै या दोन महिन्यांत 276 मिमी इतका पाऊस पडला आहे. तालुक्‍यात सुरवातीलाच मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव, तर आता ढगाळ वातावरणात होणाऱ्या रिमझिम पावसामुळे कापूस, मूग, तूर आदी पिकांवर मावा आल्याने कोकडा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यासाठी शेतकऱ्यांना महागड्या कीटकनाशकांची फवारणी करावी लागत आहे.

मोठ्या पावसाची प्रतीक्षा
ऑगस्ट महिन्यात श्रावण मास असल्याने हा पावसाचा महिना समजला जातो. या कालावधीत पडणाऱ्या पावसावर आता तालुक्‍यातील प्रकल्प व आगामी रब्बी हंगाम अवलंबून आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने पूरपरिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र असतानाच दुसरीकडे मात्र तालुक्‍यात होणाऱ्या रिमझिम व संततधार पावसामुळे सर्वच मध्यम प्रकल्प पाझर तलाव, धरणे अजूनही मृतसाठ्यात आहेत. पाऊस आहे. मात्र, पाणी नाही अशी काहीशी अवस्था झाली आहे. कन्नड शहरासह तालुक्‍यातील सर्वच प्रकल्प मृतसाठ्यात असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी तालुक्‍यात मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. तालुक्‍यात रिमझिम पावसामुळे काही भागात विहिरींना पाणी आले असले तरी बहुसंख्य विहिरींना अजूनही पाझरलेले नाही. तालुक्‍यातील शिवना टाकळी, आप्पासाहेब नागदकर (अंबाडी) प्रकल्प, अंजना पळशी, पूर्णा नेवपूर, गडदगड नागद, देवगाव, चापानेर, औराळा, जेहूर, करंजखेड, चिंचोली, नाचनवेल या भागातील धरणे अजूनही मृतसाठ्यात आहेत. ऑगस्ट महिन्यात जोरदार पाऊस पडून धरणात पाणीसाठा येईल, अशी तालुक्‍यातील शेतकऱ्यांना आशा असल्याने जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.

चौतीस हजार हेक्‍टरवर मका
मक्‍याला गेल्या वर्षी दोन हजार रुपयांपर्यंत विक्रमी भाव मिळाल्याने या वर्षी मोठ्या उमेदीने शेतकऱ्यांनी मक्‍याची पेरणी 34 हजार 952 हेक्‍टरवर केली. मात्र, सुरवातीलाच लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने विषारी महागडी कीटकनाशकांची फवारणी करावी लागली आहे. त्यामुळे मजुरीसह इतर खर्च वाढला आहे. एवढे करूनही मक्‍याच्या उत्पन्नात घट येती की काय अशी भीती शेतकऱ्यांच्या मनात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com